नावात काय आहे?
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
नावात काय आहे? असा सर्व साधारण प्रश्न विचारला जातो. पण नाम साधर्म्य असल्याने अनेकदा गोंधळ उडालेला दिसतो. राजकारणात तर निवडणूकीत एकाच नावाचे दोन – तीन उमेदवार उभे करुन मतदारात संभ्रम निर्माण केला जातो. कधी – कधी नाम साधर्म्याचा फायदा होतो तर कधी तोटाही होऊ शकतो. महाराष्ट्रात ठाकरे, पवार नावाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे तर ग्रामीण भागात पाटील नावाला आजही वलय आहे. यावरूनच पाटीलकी गाजवणे हा शब्द प्रयोग अस्तित्वात आला असावा!
लोकशाहीचा चौथा स्तंभ स्तंभ म्हणजे प्रसार माध्यमे. आणि या माध्यमाचा समाज मनावर गाढा प्रभाव आहे,आणि जर त्यांनी नाम साधर्म्याचा गोंधळ घातला तर चालेल का? पण झाले असेच काही तरी.
खासदार आणि आमदार कपिल पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चित नावे. शिक्षक आमदार कपिल पाटील गेली अठरा वर्षे मुंबई शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत व दुसरे कपिल पाटील म्हणजे भिवंडीचे खासदार व भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नाम साधर्म्याचा गोंधळ पत्रकार मंडळी नेहमीच करत असतात.
वाढदिवस एकाचा फोटो दुसर्याचा. अटक खासदाराला चर्चा आमदाराची यामुळे प्रकरण निस्तरताना संबधित नेत्यांची त्यांच्या पीएची व पीआरची तारेवरची कसरत पहायला मिळते. राज्यातील अग्रगण्य वृत्त वाहिनीने असाच एक गोंधळ घातला. मुंबईतील शिक्षक आमदार व समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री. कपिल पाटील यांनी मग सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या ट्विटर अकाउंटवर खुलासा केला आहे. व शिक्षकांमध्ये तो चर्चिला जात आहे. आमदार कपिल पाटील यांचे ट्विटर अकाउंटवरील भाष्य आम्ही जसेच्या तसे तुमच्यासाठी देत आहे.
भाजपचे भिवंडीचे खासदार आणि माझे हमनाम कपिल पाटील यांनी काही वक्तव्य केल्याची बातमी झी 24 तास वृत्त वाहिनीने चालवली आहे. पण त्यात फोटो / व्हिडिओ माझा वापरला आहे. हे असं नेहमीच होत असतं. मी सार्वजनिक आयुष्यात वाढदिवस साजरा करत नाही, पण खासदार कपिल पाटील यांचा वाढदिवस असला की अनेक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या माझे म्हणजे आमदार कपिल पाटील यांचा फोटो छापतात.
राजकारणात प्रसिद्धी कुणाला नको असते ? पण मी कधीही प्रसिद्धीच्या मागे लागत नाही. ओबीसी समाजावर वक्तव्य केल्यावरून बातमी करण्यात आली आहे त्यात फोटो, व्हिडिओ माझा वापरला आला आहे. किती विरोधाभास आहे यात. मी माझं संपूर्ण आयुष्य ओबीसी, शोषित, वंचित कष्टकरी लोकांसाठी प्रश्नांसाठी वाहून घेतलं आहे. माझ्याकडून असं कोणतंही वक्तव्य कसं होऊ शकतं ? यापुढे तरी माझे पत्रकार मित्र याची काळजी घेतील आणि मला माझी हक्काची, माझ्या कामाची बातमी देतील, अशी अपेक्षा करतो. त्यांचं प्रेम असंच राहूदे. झी 24 तास च्या पत्रकारावर बिलकुल राग नाही. पण पुढच्या वेळेस त्यांनी काळजी घेऊन बातमी करावी, हीच अपेक्षा.
मात्र अशा बातम्यांमुळे अनेकजण काळजीपोटी, तर कधी शुभेच्छा देण्यासाठी फोन, एसएमएस करतात, त्या सर्वांचा मी आभारी आहे. झिंदाबाद!
आमदार कपिल पाटील हे पुर्वाश्रमीचे पत्रकार आहेत यामुळेच पत्रकारांवर राग न धरता त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा केली आहे.. राजकारणी व त्यांचे पत्रकार प्रेम यात नवल ते काय?