आँचल ने सांगितले त्या घटनेमागील सत्य

नांदेड / विशेष प्रतिनिधी
प्रियकराच्या मृतदेहा सोबत लग्न करून चर्चेत आलेल्या आँचल मामिडवार ने सक्षम च घर सोडण्यामागील कारण सांगितले आहे. तिने सक्षम च्या कुटुंबीयांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण अचानक तिने घर सोडल्याने ती चर्चेत आली आहे.
सक्षमच्या लहान भावाकडून आपल्याशी गैरवर्तन होत असल्याचा गंभीर आरोप करत, ही बाब कुटुंबीयांना सांगूनही त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यामुळे पोलिसांना माहिती देऊनच आपण घर सोडल्याचा दावा आंचलने केला आहे.
नांदेडमधील सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आलं होतं. प्रेमसंबंधांना विरोध असल्याने सक्षमची हत्या झाल्याचा आरोप आंचलच्या कुटुंबीयांवर करण्यात आला होता. त्यानंतर आंचलने स्वतःच्या कुटुंबाविरोधात साक्ष देत सक्षमच्या मृतदेहासोबत विवाह केला होता. तसेच आयुष्यभर सक्षमच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला होता.
मात्र काही दिवसांपूर्वी सक्षमची आई संगीता ताटे यांनी आंचल घर सोडून गेल्याचा आरोप केला होता. एका मुलाखतीत त्यांनी आंचल आजीकडे जाण्याचे सांगून निघून गेल्याचे म्हटले होते. तसेच सक्षमला न्याय मिळवण्यासाठी आता आम्हालाच एकट्याने लढावं लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
या आरोपांवर उत्तर देताना आंचल मामिडवार म्हणाली की, सक्षमचा लहान भाऊ तिच्याशी गैरवर्तन करत होता. याची माहिती तिने सक्षमच्या कुटुंबीयांना दिली होती, मात्र तिच्या म्हणण्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. भविष्यात आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वांना सांगून आणि पोलिसांना कल्पना देऊनच तिने घर सोडल्याचा दावा केला. पोलिसांनी स्वतः तिला तिच्या वडिलांच्या घरी सोडल्याचेही तिने सांगितले.
याशिवाय, सक्षमच्या वडिलांच्या मृत्यूबाबतही आंचलने स्पष्टीकरण दिले. त्यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला असून त्याचा आपल्या घर सोडण्याशी कोणताही संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले.
दरम्यान, घर सोडल्यानंतर सोशल मीडियावर आपल्याविरोधात विविध प्रकारच्या चर्चा आणि टीका होत असल्याबद्दलही आंचलने नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सत्य जाणून न घेता कोणावरही आरोप करू नयेत, असे आवाहनही तिने केले आहे.




