पोलिसांनी अटक केलेल्या जोडप्याच मृत्यू ; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप

तरौना ( बिहार) / नवप्रहार डेस्क
नवऱ्याने अल्पवयीन मेहुणीशी लग्न केल्याचे समजताच बायकोने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी बाल विवाह कायद्या अंतर्गत कारवाई करत दोघांनाही अटक केली. या दोघांनी ठाण्यातच आत्महत्या केली. गावकऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी ठाण्यावर हल्ला केला. त्यांच्या मते जोडप्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला. आता खरे काय हे चौकशी नंतरच कळणार आहे.
तरौना गावातील एकाने आपल्या अल्पवयीन मेहुणीशी लग्न केलं. ही मेहुणी अवघ्या १४ वर्षांची आहे. आपल्या पतीने अल्पवयीन बहिणीशी लग्न केल्याचं समोर येताच पत्नीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार या जोडप्याला अटक करण्यात आली. परंतु, तुरुंगात गेल्यानंतर या जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या जोडप्याने आत्महत्या केल्याचं समजताच गावकरी पोलीस ठाण्यात जमा झाले. या रहिवाशांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली. एवढंच नव्हे तर संतप्त जमावाने पोलीस ठाण्याच्या आतील इमारतीची जाळपोळ केली आणि पोलिसांवर दगडफेक केली. हिंसाचारात जखमी झालेल्या तीन पोलिसांपैकी एक असलेले अररियाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक रामपुकर सिंग म्हणाले, “गावकरी पोलिसांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला.” पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात दोन जण जखमी झाले.
जोडप्याची हत्या?
परंतु, या जोडप्याचा मृत्यू आत्महत्येमुळे नाही तर पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अररियाचे पोलिस अधीक्षक डॉ. अमित रंजन यांनी हा दावा फेटाळून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचं सांगितलं. तसंच, पोलीस ठाण्यावर हल्ला केल्यामुळे १९ जणांना अटक केल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे.