पंचवीस पट जास्त राशी मोजून त्याने व्यक्त केली कृतज्ञता


तेलंगणा /विशेष प्रतिनिधी
आजच्या युगात तुम्ही जर कोणावर दया दाखवून त्याला आर्थिक मदत केली आणि काही काळानंतर त्याला आपण उसनवारी दिलेली रक्कम परत मागितली. तर तो आज देतो उद्या देतो म्हणून वेळ मारून नेतो. त्याला आपली अडचण सांगून देखील तो वेळेवर कामी पडत नाही. काही वेळा तर मी कुठे पळून चाललो का ? माझ्या कडे आल्यावर मी स्वतः तुझे पैशे परत करेल असे नानाविध आश्वासने देतो. उसनवारी वरून अनेक वेळा आपसात भांडण होऊन सबंध किंवा चांगली मैत्री तुटते. पण ते म्हणतात न की वादाला अपवाद असतो असाच प्रकार तेलंगणात घडला आहे.
असेच एक अपवादात्मक सज्जन आहेत. ज्यांनी आखाती देशात काम करणाऱ्या आपल्या मित्राकडून त्यावेळी म्हणजे सुमारे २५ वर्षांपूर्वी १२० रियाल भारतीय मुद्रे नुसार १ हजार उसने घेतले होते. त्यानंतर ते दोघेही मायदेशी म्हणजे भारतात परतले. आता त्यावेळी सोशल मिडिया वैगेरे काही नसल्याने त्यांच्यात पुन्हा संवाद होऊ शकला नाही. केरळ मधील मित्राला इतकेच माहित होते की आपला मित्र तेलंगणाच्या धर्मपुरी येथे राहतो.
केरळ मधील पलक्कड येथील हा मित्र अगदी प्रामाणिक. ज्याने आपणाला अडचणीत मदत केली तर त्याचे ऋण कसे फेडता येईल हाच विषय त्याच्या डोक्यात फिरत होता. मग काय त्याने त्यावेळी मदत करणाऱ्या मित्राला शोधून काढून त्याचे पैशे परत करण्याचा निर्धार केला. मित्राला दुसऱ्या राज्यात जाऊन शोधणे की काही सोपे काम नव्हते. कारण पलक्कड ते धर्मपुरी अंतर आहे १२०० किमी. त्यातल्या त्यात याच्याकडे त्याचा कुठलाही पत्ता नव्हता.
मोठ्या शहरात मित्राचा पत्ता शोधून काढणे म्हणजे भुसाच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखे होते. पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा वाट्टेल ते करायला तयार होता. मग काय त्याने निर्धार केल्यावर तो मित्राच्या शोधासाठी धर्मपुरी कडे निघाला.
हा तेलंगणात पोहचला खरा पण समस्या येत होती ती भाषेची. पण त्याने थोडीही हार न मानता किंवा खचून न जाता त्याने गुगल ॲप्स ची मदत घेतली. एका जुन्या मित्राच्या मदतीने ज्याला उसनवारीचे पैशे परत करायचे होते त्याचा पत्ता शोधून काढला. आणि त्याचे घर गाठले.
शेवटी निराशा पण कुटुंबीयांचे आदरातिथ्य –
जेव्हा हा त्या मित्राच्या घरी पोहचला तेव्हा कळले की मित्र पुन्हा आखाती देशात कामासाठी गेला आहे. आखाती देशात असलेल्या मित्राच्या कुटुंबीयाने कॉल करून दोघांचे बोलणे करून दिले. अनेक वर्षाच्या भेटीनंतर दोघांचेही डोळे पाणावले. त्याने मित्राच्या कुटुंबियांच्या हातात २५ हजार रुपये ठेवले. दरम्यान ज्या कुटुंबाकडे तो रक्कम घेऊन गेला होता त्याच्या कुटुंबीयांचे आदरातिथ्य पाहून हा भारावला.
शोधून देखील सापडणार नाही अशी प्रामाणिकता
– ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.अनेकांच्या मते पूर्वी लोक शब्दाला जागत होते. आणि त्यांची मैत्री जुनी असल्याने त्याने १ हजाराचे २५ हजार परत केले.




