सायबर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; पोलीस अधिकाऱ्यांचा नावाचा आणि फोटोचा करीत होते वापर
मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा बांगुर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सायबर चोरटे पोलीस अधिकारी यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करीत लोकांना गंडा घालत होते. या टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी कोलकाता, मुंबई आणि विशाखापट्टणम येथून अटक केली आहे.
ही टोळी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा आणि फोटोंचा वापर करून सायबर चोऱ्या करत होते. पोलीस चौकशीमध्ये या टोळीचे चीन कनेक्शनही समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा म्होरक्या हैदराबाद येथील श्रीनिवास राव (वय – 49) आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून तो दररोज कोट्यवधी सुपयांची सायबर फसवणूक करत होता, मात्र पोलिसांच्या रडावर आला नव्हता. अवघे बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या या सायबर चोराने कोट्यवधींची माया जमवली होती. पोलिसांनी त्याची 40 बँक खाती गोठवली असून यात जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम होती. विशाखापट्टणममधील एका फाईव्हस्टार हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे.
राव आणि त्याची टोळी स्काईप किंवा व्हाट्सअॅपच्या माध्यमातून सायबर चोरी करत होते. हे चोर स्काईप आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून कॉल करायचे आणि तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगायचे. याची शहानिशा करण्यासाठी संबंधितांना पोलीस स्थानकात बोलावले जायचे. मात्र पोलिसांचे नाव आणि त्यांचा फोटो पाहून घाबरगुंडी उडालेले लोक यातून वाचण्यासाठी तडजोड करायचे आणि त्यांना पैसे द्यायचे. तसेच अनेक पीडितांना ते रिमोटने कंट्रोल होणारे अॅप डाऊनलोड करायला सांगायचे आणि त्यांचे तपशील टाकायला सांगायचे. यानंतर त्यांचे बँक खाते रिकामे करायचे, अशी माहिती पोलीस उपायुक्त कुमार बंसल यांनी दिली.
या सायबर चोरट्यांनी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकातासह देशातील अनेक शहरांमधील नागरिकांची फसवणूक केली आहे. आरोपी पोलिसांची वर्दी घालून व्हिडीओ कॉल करायचे आणि नागरिकांना भीती दाखवून त्यांची फसवणूक करायचे. याची माहिती पोलिसांना मार्च महिन्यात मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी विविध पथके चार वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवली. फसवणूक केलेली रक्कम एजंटद्वारे चालवल्या जाणाऱ्या बँक खात्यांमध्ये जात होती. यापैकी महेंद्र रोकडे आणि मुकेश दिवे यांना पोलिसांनी टिटवाळ्यातून, तर संजय मंडल आणि अनिमेश वैद यांना कोलकाता येथून अटक करण्यात आली. त्यांचा म्होरक्या हैदराबादमधून फरार होऊन विशाखापट्टणम येथे लपून बसला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली.
रावने हिंदुस्थानमध्ये फसवणूक करून जमा केलेला फैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये रुपांतरित करत होता. त्यानंतर हा पैसा तो चीनला पाठवत असे. चीनमधील बँकांमध्येही त्याचे खाते असून चिनी सायबर गुन्हेगाऱ्यांच्याही तो संपर्कात होता, असेही पोलीस तपासातून समोर आले आहे. त्याने आपल्या पत्नीच्या बँक खात्यात 25 लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे समोर आले असून या गुन्ह्यांमध्ये त्यांच्या कुटुंबाचाही सहभाग आहे अथवा नाही याचा पोलीस तपास करत आहेत.