नाना आऊट सपकाळ नवे प्रदेशाध्यक्ष

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांना हटवून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.
कोण आहेत हगर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित आहेत.
झाली होती निलंबणाची कारवाई…
22 मार्च 2017 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यत्यय आणल्याबद्दल आणि विधानसभेबाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह 18 आमदारांवर निलंबणाची कारवाई झाली होती. त्यानतंर तीन आठवड्यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.
पटोलेंच्या नेतृत्त्वाचा काँग्रेसचा मोठा पराभव
नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानतंर आता हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. ते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी काँग्रेसनं नवा चेहरा आणला असल्यानं आता काँग्रेसची येत्या काळातली कामगिरी कशी राहते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.