सावंगा विठोबा नियमित बस फेरी सुरू करण्यासाठी परिवहन विभागीय नियंत्रकाला निवेदन
अवधूत महाराज भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी विश्वस्तांचे प्रयत्न.
*चांदुर रेल्वे ( ता. प्र.) प्रकाश रंगारी*
श्री क्षेत्र सावंगा( विठोबा) महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्थान असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी वर्षभरात 15 ते 16 लाख भाविक भक्त दर्शनाकरिता येतात. परंतु या ठिकाणी भाविकांना प्रवासाकरता कोणत्याही प्रकारची बस सुविधा नसल्याने या भाविकांची गैरसोय होते. ती गैरसोय होऊ नये म्हणून, भाविका करिता चांदुर रेल्वे व अमरावती येथून कायमस्वरूपी बस सुरू करण्यासाठी सावंगा विठोबा संस्थान चे अध्यक्ष पुंजाराम वै. नेमाडे व विश्वस्त यांनी विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती यांच्याकडे बस फेरी सुरू करण्याचे निवेदन दिले.
वर्षभरात या ठिकाणी 15 ते 16 लाख भाविक भक्त दर्शनाकरिता येतात. परंतु या ठिकाणी भाविकांना प्रवासाकरता, कोणत्याही प्रकारची एसटी बसेसची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना इतर खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असून भाविकांना प्रवासाचा आर्थिक आवाजवी बोजा सहन करावा लागतो. या ठिकाणी प्रवासाचे साधन नसल्यामुळे कधी कधी भाविकांना पायदळ सुद्धा प्रवास करावा लागतो या ठिकाणी लूटमारीच्या सुद्धा घटना घडतात. गुढीपाडवा व रामनवमीची यात्रा ही या ठिकाणची महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा असून, चार ते पाच लाख भाविक एकाच दिवशी दर्शनाकरिता येतात. एसटी महामंडळाला या यात्रेचे लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. तसेच वर्षभर दसरा,श्रावण,आषाढी,कार्तिक,पौष,गोकुळाष्टमी, व मासिक अमावस्या इत्यादी यात्रा उत्सवाला भावीक भक्तांची हजारोच्या संख्येने ये – जा चालू असते.तसेच दर बुधवार व दर रविवारी या ठिकाणी बाहेर गावातील भाविक भक्तांची प्रचंड गर्दी राहते. त्यामुळे या ठिकाणी एसटी बसची सुविधा सुरू करणे आवश्यक असून,भाविक भक्तांची गैरसोय टाळता येईल. तरी आपण लवकरच बस फेरी सुरू करावी.असे निवेदन विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती त्यांच्या कडे सांवगा विठोबा संस्थान अध्यक्ष पुंजाराम वै. नेमाडे व विश्वस्त कृपासागर राऊत, अशोक ह. सोनवाल, विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, वैभव मानकर, चरणदास कांडलकर, स्वप्निल चौधरी यांनी दिलेले असून स्वतः सर्व उपस्थित होते.