क्राइम

इन्स्टा वरील प्रियकराला तिने भेटीसाठी 900किमी वरून बोलविले अन्…..

Spread the love

नरसिंगपूर ( मध्यप्रदेश ) / विशेष प्रतिनिधी

                त्यांची इन्स्टाग्राम वर ओळख झाली.ओळीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात.  तो राजस्थान चा तर ती मध्यप्रदेश ची. महिलेने तरुणाला भेटीसाठी मध्यप्रदेश राज्यातील नरसिंगपूर येथे बोलावले. आता प्रेमात पडलेल्या प्रियकराने प्रेयसीने बोलाविलेले ठिकाण गाठले पण त्याला काय माहिती होते की हा प्रवास आपला शेवटचा प्रवास ठरेल म्हणून. 

 नरसिंगपूरच्या साईंखेडा येथे राहणाऱ्या रीना किरार या विवाहित महिलेने तिचा जुना प्रियकर अरुण पटेल आणि एका साथीदाराच्या मदतीने राजस्थानमधील भीलवाडा येथील रहिवासी असलेल्या वीरू ऊर्फ पप्पू जाट याची हत्या केली.

वीरू आणि रीना यांची ओळख इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून झाली होती, जी पुढे प्रेमसंबंधात बदलली. वीरू वारंवार राजस्थानमधून मध्य प्रदेशात तिला भेटायला येत असे. मात्र, रीनाचा जुना प्रियकर अरुण पटेल, जो नात्याने तिचा भाऊ लागत होता, त्याला हे संबंध मान्य नव्हते. अरुणनेच रीनाला महागडी गाडी आणि दागिने दिले होते, त्यामुळे वीरूचे तिच्या आयुष्यात येणे त्याला सहन होत नव्हते. यातूनच वीरूचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.

बेसबॉल बॅटने डोक्यावर हल्ला करून घेतला जीव; 200 किलोमीटर दूर फेकला मृतदेह

योजनेनुसार, 29 एप्रिल रोजी रीनाने वीरूला फोन करून आपल्या घरी बोलावले. वीरू 900 किलोमीटरचा प्रवास करून तिला भेटायला पोहोचला, पण तिथे आधीच अरुण पटेल आणि हरनाम किरार दबा धरून बसले होते. वीरू घरात शिरताच तिघांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला आणि बेसबॉल बॅटने त्याच्या डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात वीरूचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातील रक्ताचे डाग साफ केले, जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे हात-पाय बांधले, तोंडावर टेप लावला आणि प्रेत एका गोणीत भरले. हा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून आरोपींनी नरसिंगपूरपासून सुमारे 200 किलोमीटर दूर रायसेन जिल्ह्यातील टेडिया पुलाखाली 40 फूट खोल दरीत फेकून दिला.

पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी बदलले ठिकाणे; मुंबई ते उज्जैन असा केला प्रवास

गुन्हा केल्यानंतर पोलिसांना पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी वारंवार आपली ठिकाणे बदलली. मृतदेह फेकून दिल्यानंतर ते प्रथम इटारसीला गेले आणि तिथून मुंबईतील कल्याण परिसरात जाऊन लपले. त्यानंतर त्यांनी इंदूर, उज्जैन, भोपाळ, रतलाम अशा विविध शहरांमध्ये फिरून आपली लोकेशन ट्रेस होऊ नये याची काळजी घेतली. दरम्यान, रायसेन पोलिसांना पुलाखाली गोणीत बंद असलेला एक अज्ञात मृतदेह आढळला. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले आणि तोंडावर टेप असल्याने हा हत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सचा सखोल तपास सुरू केला, तेव्हा रीना किरार आणि अरुण पटेल यांच्यावरील संशय बळावला. अखेर पोलिसांनी उज्जैनमधून तिन्ही आरोपींना मुसक्या आवळल्या.

अनैतिक संबंधाने डोक्यात तिडिक गेली अन् रचला कट; तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रायसेनच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, ही हत्या पूर्णपणे नियोजनबद्ध होती. अरुण पटेलला रीनावर स्वतःची पूर्ण मालकी हवी होती आणि वीरूचा हस्तक्षेप त्याला सहन होत नव्हता. पोलिसांनी आरोपींच्या निशानदेहीवरून हत्येत वापरलेली बेसबॉल बॅट आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली कार जप्त केली आहे. सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना फिरवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. सध्या या तिघांविरुद्ध हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. सोशल मीडियावरील आभासी आकर्षणाने एका तरुणाचा जीव घेतल्याची ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close