केसराळी ते खतगाव जाणाऱ्या रस्त्यावरिल खचण्याच्या मार्गावर असलेला पूल देत आहे अपघाताला आमंत्रण
बिलोली (प्रतिनिधि):
तालुक्यातील बोधन ते देगलूर जाणाऱ्या रस्त्यावर केसराळी गावालगत असलेला ओहोळावरील पूल खचण्याच्या मार्गावर आहे. मिनकीच्या परिसरातून वाहत जाऊन हे ओहोळ केसराळी पासून अर्धा किमी अंतरावर दक्षिण दिशेला असलेल्या मन्याड नदीला मिळतो. पावसाळ्यात जोराचा पाऊस पडला की पूलावून पाणी ओसंडून वाहू लागते. व खतगाव ते केसराळी गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे खतगाव येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
बिलोली तालुक्यातील संपर्क तुटणारे गावांमध्ये जोड रस्त्याचे व पुलाचे काम चालू आहे. मात्र केसराळी गावाचा विसर आ. जितेश अंतापुरकर यांना पडला की काय अशी चर्चा गावकऱ्यातून रंगू लागली आहे. गत वर्षी पावसाळ्यात माजी आमदार सुभाष साबणे आणि आजि आमदार जितेश अंतापुरकर या दोघांनीही या पुलाची पहाणी केली होती. परंतु याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. दि. १६ व १७ जुलै रोजी मुसळधार पडलेल्या पावसामुळे पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहून पूल खचण्याच्या मार्गांवर आहे. या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. यासाठी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे, पण याकडे सा. बा. विभागाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सरपंच यांनी नव प्रहार प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.