बापरे….. चार महिन्यात २२ गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा ; कोण आहेत हे न्यायाधीश ?


मुजफ्फरनगर / विशेष प्रतिनिधी
भारतातील न्यायालयीन प्रक्रिया फार लिचड आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण न्यायालयीन खटले अनेक वर्ष चालतात असा जवळपास सगळ्यांनाच किंवा अनेकांच्या जवळच्यांना अनुभव आहे. पण उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील फास्ट ट्रॅक कोर्टाच्या (जलद गती न्यायालय) न्यायाधीशांनी गेल्या चार महिन्यांत १० वेगवेगळ्या खटल्यांचा निकाल देत तब्बल २२ गुन्हेगारांना फाशीची (मृत्यूदंडाची) शिक्षा सुनावली आहे.
या धडाकेबाज निकालांमुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. रवी कुमार दिवाकर कडक निकालांसाठी ओळखले जातात. यांनीच २०२२ मध्ये वाराणसीच्या प्रसिद्ध ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्याचे ऐतिहासिक आदेश दिले होते.
दिवाणी न्यायाधीश म्हणून कारकीर्दीला सुरुवात
मूळचे लखनौ येथील रहिवासी असलेले न्यायमूर्ती दिवाकर यांनी २००९ मध्ये आझमगड येथून अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश म्हणून आपल्या न्यायव्यवस्थेतील सेवेला सुरुवात केली. मे २०१५ मध्ये सुलतानपूर येथे दिवाणी न्यायाधीश आणि पाच महिन्यांनंतर न्यायालयीन दंडाधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली. बी.कॉम. आणि एलएल.एम. पदवीधारक असलेले दिवाकर हे नोव्हेंबर २०२५ पासून मुझफ्फरनगर येथे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून सेवा बजावत आहेत. गेल्या ४ महिन्यांतील त्यांनी महत्त्वपूर्ण आणि मोठे निकाल जाणून घेवूया…
१२ वर्षे जुन्या हत्या प्रकरणात ४ जणांना फाशी
१३ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती दिवाकर यांनी १२ वर्षे जुन्या एका खून प्रकरणात रामवीर, राजीव, राहुल आणि हरेंदर कुमार या चार आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा आणि प्रत्येकी १.७० लाख रुपयांचा दंड ठोठावला. १४ जुलै २०१४ रोजी शामली जिल्ह्यात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी पवन कुमार यांच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला होता. यात पवन कुमार यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला होता.
कर्तव्यावर असलेल्या होमगार्डच्या हत्येप्रकरणातील आरोपीला फाशी शिक्षा
२ जुलै रोजी न्यायाधीशांनी कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड रतीराम यांची हत्या करणाऱ्या दीपक नावाच्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. ४ जून २०२० रोजी आरोपी दीपक त्याच्या आईला मारहाण करत असताना रतीराम यांनी मध्यस्थी केली होती. याचा राग येऊन दीपकने रतीराम यांच्यावर सुऱ्याने वार करून त्यांची हत्या केली होती.
आणखी एका खून प्रकरणात दोघांना देहदंड
२० जून रोजी राजेंद्र सैनी यांच्या हत्या प्रकरणात गजेंद्र आणि रामकिरण या दोघांना ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ प्रकरण मानत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ३० मे रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने १५ वर्षांपूर्वी एका महिलेची आणि तिच्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या ५० वर्षीय रहीस या आरोपीला फाशीची शिक्षा दिली. ७ नोव्हेंबर २०११ रोजी वादातून रहीस याने राजेश देवी (वय ३०) आणि त्यांचा मुलगा हिमांशू यांना ऊसाच्या शेतात नेऊन विटांनी ठेचून मारले होते.
२०१९ मधील खून प्रकरणात महिलेसह ३ मुलांना फाशी
२८ एप्रिल रोजी न्यायमूर्ती दिवाकर यांनी २०१९ मधील एका हत्या प्रकरणात एका महिलेला आणि तिच्या तीन मुलांना फाशीची शिक्षा सुनावली.
वकिलाच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी तिघांना मृत्यूदंड
६ एप्रिल रोजी मुझफ्फरनगर फास्ट ट्रॅक कोर्टाने ४५ लाख रुपयांच्या आर्थिक वादातून वकील मोहम्मद समीर यांचे अपहरण करून त्यांची हत्या करणाऱ्या तीन जणांना फाशीची शिक्षा सुनावली. आरोपींनी वकिलाची हत्या करून त्यांचा मृतदेह सिकरी गावातील जंगलात फेकून दिला होता.




