अचानक ब्लॅक आउट ; भारत कुठल्या मोठ्या तयारीत आहे की काय ?

अचानक ब्लॅक आउट ; भारत कुठल्या मोठ्या तयारीत आहे की काय ?
श्रीनगर/नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
मागील काही काळात अशात असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा शांतता नांदू लागली आहे. पण यावेळी ही शांतता कोणत्याही अनिष्ट घटनेची नसून मोठ्या तयारीची चाहूल आहे. पहलगाम हल्ल्याच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात सरकारने अचानक ब्लॅकआउट आणि एअर रेडसारख्या धोकादायक परिस्थितींना तोंड देण्यासाठी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.
20 ते 24 एप्रिलदरम्यान होणाऱ्या या सरावामुळे खोऱ्यात हालचाल वाढली असून सर्वत्र एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, खोऱ्यात काही मोठे घडणार आहे का?
ज्या पद्धतीने सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, होमगार्ड्स आणि आपत्कालीन यंत्रणांना युद्धपातळीवर सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यावरून प्रशासनाला एखाद्या मोठ्या सुरक्षा आव्हानाची शक्यता वाटत असल्याचे दिसून येते. आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांची चेतावणी आणि अचानक लागू होणारा ब्लॅकआउट यांसारख्या परिस्थितींचा सराव अशा वेळी केला जात आहे, जेव्हा भूतकाळातील जखमा अजूनही ताज्या आहेत. हा केवळ नियमित सराव आहे की सीमापारच्या एखाद्या मोठ्या कटाला हाणून पाडण्यासाठी आखलेली रणनीती, याबाबत चर्चा सुरू आहे.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
जम्मू-कश्मीर सरकारच्या गृह विभागाने संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सिव्हिल डिफेन्स एअर रेड आणि ब्लॅकआउट मॉक एक्सरसाइज आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. हा सराव 20 एप्रिल ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत कोणत्याही योग्य दिवशी आयोजित केला जाणार आहे. यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या-त्यांच्या भागात विविध यंत्रणांशी समन्वय साधून हा सराव यशस्वी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, होमगार्ड्स आणि इतर संबंधित यंत्रणांची मदतही घेण्यात येणार आहे.
काय आहे संपूर्ण योजना?
या मॉक ड्रिलदरम्यान एअर रेडची चेतावणी, ब्लॅकआउट, नागरिकांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण, शोध आणि बचाव मोहीम (Search & Rescue) तसेच आपत्कालीन प्रतिसाद यांसारख्या विविध बाबींचा सराव करण्यात येणार आहे. या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि यंत्रणांची तयारी तपासणे आणि ती अधिक सक्षम करणे हा आहे.
सरकारने हेही स्पष्ट केले आहे की या सरावाबाबत आधीच जनतेला माहिती देण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अफवा किंवा घबराट निर्माण होऊ नये. सर्व जिल्ह्यांना या सरावानंतर अॅक्शन टेकन रिपोर्ट (ATR) फोटो आणि व्हिडिओंसह सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही मॉक ड्रिल केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरात एकसमान तयारी निश्चित करण्यासाठी आयोजित केली जात आहे. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देता येईल.




