राजकिय

आमदार पत्नीच्या मुख्य अभियंता पतीचा तडकाफडकी राजीनामा

Spread the love

अंत अस्ति प्रारंभ’ अंत नही, यह एक नई शुरुआत है, ठेवले व्हॉट्स ॲप या स्टेटस 

छत्रपती संभाजी नगर / विशेष प्रतिनिधी

बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी  ‘अंत अस्ति प्रारंभ’ अंत नही, यह एक नई शुरुआत है, असे स्टेट्स ठेवत तडकाफडकी आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अतुल चव्हाण हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत.

 

 

गेल्या काही दिवसापासून त्यांच्या विरोधात आरोपांचे सत्र, मतदारसंघात आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर अतुल चव्हाण यांचा अचनाक आलेला राजीनामा आणि अंत अस्ति प्रारंभचे स्टेट्‍स यावरून ते सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

32 वर्ष प्रशासकीय सेवा केल्यानंतर चार वर्षाआधीच चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे एकाच घरात राजकारण आणि प्रशासन नको, असा सल्ला त्यांना दिल्यामुळेच त्यांनी मुख्य अभियंता पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. अतुल चव्हाण हे सचिव पदाच्या पदोन्नतीसाठी प्रयत्नशील होते.

 

सेवा ज्येष्ठतेनूसार त्यांना पदोन्नती अपेक्षित होती, तसा प्रस्ताव देखील शासनदरबारी प्रलंबित होता. परंतु त्यावर अद्याप कुठलाच निर्णय न झाल्याने ते नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. याच कारणामुळे त्यांनी 31 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे आपल्याला सेवा मुक्त करावे, असे म्हणत सेवा समाप्तीची नोटीस दिली आहे.

अतुल चव्हाण यांची 22 जून रोजी नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी मुंबई येथे मुख्य अभिंयता म्हणून बदली केली आहे. 31 जुलै रोजी त्यांना तिथे रूजू होण्याचे आदेश दिले होते. त्याआधीच चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पत्नी सत्ताधारी भाजपा पक्षाच्या आमदार असल्यामुळे त्यांना फुलंब्री मतदारसंघातूनच विरोध सुरू झाला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधकांनी आंदोलनही केली होती.

बॅनरबाजीनंतर केले होते आवाहन.. अनुराधा चव्हाण या फुलंब्रीतून आमदार झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर, स्वागताच्या बॅनरवर समर्थकांकडून अतुल चव्हाण यांच्या फोटोचा सर्रासपणे वापर केला जात होता. जाहिरातीच्या फलकांवरही त्यांचे फोटो झळकल्याने ते अनेकदा अडचणीत आले होते.

त्यानंतर त्यांना आमदार पत्नी अनुराधा चव्हाण यांना थेट पत्र पाठवून आपण शासकीय पदावर असल्यामुळे शुभेच्छा, स्वागताच्या बॅनर किंवा जाहीरातींमध्ये आपला फोटो वापरला जाऊ नये, असे सांगावे लागले होते. मतदारसंघातील अतुल चव्हाण यांचा वाढता हस्तक्षेप देखील भाजपामधील स्थानिक नेत्यांना खटकत होता. विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाट आणि चव्हाण यांच्यातही अनेकदा खटके उडल्याचे दिसून आले होते.

आता थेट राजकीय आखाड्यात का? प्रशासनातील महत्वाचे पद असल्यामुळे अतुल चव्हाण यांना सक्रीय राजकारणात उतरणे अडचणीचे ठरत होते. शिवाय त्यांच्यावर होणाऱ्या आरोप, राजकीय टीकेलाही त्यांना उत्तर देता येत नव्हते. ‘अंत नही, यह एक नई शुरुआत है’ हे त्यांचे व्हाॅट्सअप स्टेट्‍स त्यामुळे बरेच बोलके ठरत आहे.

अनुराधा चव्हाण यांनी आमदार होण्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या भाजपामध्ये आल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फुलंब्रीत कामाला सुरूवात केली होती. राजस्थानच्या राज्यपाल पदी बागडे नाना यांची नियुक्ती झाल्यानंतर 2024 मध्ये अनुराधा चव्हाण यांना मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि त्या विजयी झाल्या.

चव्हाण पती-पत्नी यांच्या राजकीय, प्रशासकीय आणि वैयक्तिक जीवनात हरिभाऊ बागडे नाना यांचा सल्ला मोलाचा आणि कायम मार्गदर्शक राहिला आहे. आता अतुल चव्हाण हे आपली पुढची राजकीय इनिंग कोणाच्या सल्ल्याने खेळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close