चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू

एकाची प्रकृती गंभीर ; मृतात चार महिला आणि दोन पुरुष
नवीदिल्ली / प्रतिनिधी
एका चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत सहा लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांनध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आगीचे रूप इतके उग्र होते की घरातील लोकांना बाहेर येण्याची संधी मिळाली नाही. काही लोकांनी छतावर जाऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या इमारतीत राहणारे सगळे लोक भाडेकरू होते. घटना ८ च्या सुमारास घडली
अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी या घटनेबाबत सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेल्या अवस्थेत सात जणांना वाचवले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. यामध्ये चार महिला आणि दोन पुरुष आहेत. पोलीसांकडून मृत आणि जळालेल्या लोकांची ओळख पटवण्यात येत आहे.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत राहणारे सर्व लोक भाडेकरू होते. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीतमपुरा येथील झेडपी ब्लॉकमधील घर क्रमांक ३७ मध्ये रात्री ८ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. तळमजल्यावरून सुरू झालेली आग पहिल्या मजल्यावर पोहोचली. वरचे मजले धुराने भरले होते.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे ४५ मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. ज्या सात जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले ते दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर होते. त्यातील चौघे बेशुद्ध पडले होते. नंतर त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम दिल्लीमधील (Delhi) पीतमपुरा परिसरात असलेल्या या ४ मजली इमारतीला गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने इमारतीचे तीन मजले भक्ष्यस्थानी आले. इमारतीतून धुराचे लोट बाहेर येत होते. आग लागली असल्याचे समजताच रहिवाशांनी बाहेर पडण्यास सुरूवात केली. मात्र, एका मजल्यावर राहणारे कुटुंबीय अडकले. अचानक आगीचा भडका उडाल्याने त्यांना वेळेवर बाहेर पडता आलं नाही. स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली.