मोदी विरोधात एकवटलेले विरोधक आपल्या मनसुब्यात कितपत यशस्वी होणार ?
नवी दिल्ली / पी.संजय
मागील दोन पंचवार्षिक मध्ये भाजपा ने मोदींच्या नेतृत्वत नेत्रदीपक यश मिळवत सत्ता मिळविण्यात यश मिळवले आहे. अर्थात यात काही प्रादेशिक पक्ष आणि एनडीए सोबत मोदींकग्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्यानेच हे शक्य झाले आहे. भाजपा चे वाढणारे वर्चस्व पाहता भाजपा ला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. भाजपा ला सत्तेतून हद्दपार हा भाजपा विरोधी पक्षाचा ऐजेडा असला तरी विरोधक यात किती यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण भाजपा विरोधात एकवटलेल्या विरोधी पक्षात एकजुतात नसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेसठी ‘ वेट अँड वॉच ‘ करावे लागणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. देशात गेल्या 9 वर्षांपासून भाजपचं सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. पण या गेल्या 9 वर्षांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. भाजपची अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत युती आहे. गेल्या 9 वर्षांच्या काळात अनेक प्रादेशिक पक्षांसोबत भाजपचं बिनसलं. त्यामुळे त्याचं मैत्रीचं रुपांतर राजकीय शत्रूत्वात झालं. या दरम्यानच्या काळात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागलं. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
विरोधी पक्षांच्या मनात मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड संताप आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळाला. त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यात कमी-अधिक प्रमाणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष बघायला मिळाला. दिल्लीतही तसंच काहीसं चित्र आहे. तर दक्षिणेकडील प्रादेशिक पक्षांना देखील भाजपचं जास्त वर्चस्व नकोय. त्यामुळे ते सुद्धा भाजप विरोधात एकत्र येण्यास तयार आहेत. त्यातूनच विरोधी पक्षांनी एकत्र यावं, अशी भावना विरोधकांमध्ये निर्माण झालीय.
विरोधकांच्या आघाडीच्या नेतृत्वावरुन मतभेद?
विशेष म्हणजे देशभरातील सर्व विरोधक यासाठी सकारात्मक देखील आहेत. पण विरोधकांच्या याआघाडीचं नेतृत्व कोणी करावं, यावरुन मतभेद असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची काँग्रेस शिवाय ही आघाडी हवी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसशिवाय आघाडी करता येणार नाही, असं आधीच स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी विरोधी पक्षाच्या या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसने करु नये, असं ममता बॅनर्जी यांचं स्पष्ट मत आहे.
काँग्रेसचा अंतिम निर्णय काय असेल?
येत्या 12 जूनला पाटण्यात होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी देखील हजर राहणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून कोणीही हजर राहणार नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही दिग्गज नेते बैठकीला हजर राहतील, अशी माहिती मिळत होती. पण आता काँग्रेसचे नेते या बैठकीला हजर राहणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असं असलं तरी शरद पवार यासाठी काही प्रयत्न करतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.