या गावाची प्रथा एकतर ७ – ८ वर्षात लग्न नाहीतर वेश्याव्यवसाय

गुजरात / विशेष प्रतिनिधी
गुजरातच्या एका गावात पिढ्यानपिढ्या एक प्रथा चालत आलेली आहे.येथील मुलींचे ती सात आठ वर्षाची झाली की तिचे लग्न लावून दिल्या जाते.नाही तर तिला वेश्याव्यासायात ढकलल्या जाते. गुजरात मध्ये असलेल्या या गावाचे नाव वाडिया असून अहमदाबाद पासून हे गाव २०० किमी अंतरावर आहे.
‘वेश्यांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडिया गावातील महिला, त्यांच्यावर ऐतिहासिकदृष्ट्या लादलेल्या भूमिकांमधून मुक्त होण्यासाठी संघर्ष करत आहेत. पिढ्यानपिढ्या या भटक्या जमातीतील महिलांना लैंगिक व्यापारात ढकलले गेले आहे, तर पुरुष त्यांचे एजंट म्हणून काम करतात. ही प्रथा आजही सुरू आहे.
बनासकांठा जिल्ह्यातील ७५० लोकसंख्या असलेल्या या गावातील पुरुष दररोज सकाळी पालनपूर-थारड महामार्गावर जातात. ते महामार्गावर कामाच्या शोधात नव्हे, तर ट्रक ड्रायव्हर, वाटसरू आणि जवळपासच्या गावांतील व शहरांतील पुरुषांना आपल्या महिलांचे गिऱ्हाईक बनवण्यासाठी रांगेत उभे राहतात. भारतात बालविवाहावर बंदी आहे, पण वाडिया गाव अजूनही भूतकाळातच जगत आहे. येथे भूतकाळ वर्तमानावर वर्चस्व गाजवतो. आपल्या मुलींचे लग्न ठरवणे हा एक सुरक्षित उपाय मानला जातो, ज्यामुळे त्यांना लैंगिक व्यवसायात ढकलले जाण्यापूर्वी गावाबाहेर लग्न करता येते. वाडियामधील अनेक कुटुंबांसाठी, आपल्या मुलींना वेश्याव्यवसायापासून दूर ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
याच गावात वाढलेली एक १९ वर्षांची मुलगी या संघर्षाचे उत्तम उदाहरण आहे. तिची आई आणि आजी दोघीही वेश्याव्यवसाय करतात. ती जवळच्याच एका महाविद्यालयात नर्स होण्यासाठी शिक्षण घेत आहे. वयाच्या ११ व्या वर्षी तिचा साखरपुडा झाला आणि १८ व्या वर्षी तिचे लग्न झाले. पीटीआयला सांगताना ती म्हणाली, “मी लहानपणापासून माझ्या वडिलांना आणि काकांना माझ्या आई आणि आजीसाठी गिऱ्हाईक आणताना पाहत मोठी झाले. माझ्या आईने मला सांगितले की त्यांना यात जबरदस्तीने ढकलले गेले नव्हते, तर गरिबीमुळे प्रत्येकजण हा सामान्य व्यवसाय करत असे. त्यामुळे माझे वडील माझे खरे वडील आहेत की नाही, याची माझ्या आईला खात्री नव्हती. पण मला या धंद्यात ढकलणार नाही, असा माझ्या आईचा दृढनिश्चय होता. वयाच्या ११ व्या वर्षी एका सामूहिक समारंभात माझा साखरपुडा झाला आणि १८ व्या वर्षी माझे लग्न झाले. ती अशा अनेक मुलींपैकी एक आहे.

