प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले


त्याला तिचे इतरांशी बोलणे खटकले आणि त्याने तिला निपटवले
रायपूर (छत्तीसगढ ) / विशेष प्रतिनिधी
ती विवाहित आणि दोन मुलांची आई तर तो अविवाहित.पण त्यांच्यात प्रेमाचे नाते जुळले. त्याला तिचे इतरांशी बोलणे खटकायचे.म्हणुन त्याने तिला निर्जनस्थळी नेट तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
वीरू धीवर असं अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तर राजकुमारी साहू असं हत्या झालेल्या विवाहित तरुणीचं नाव आहे. आरोपी वीरू याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत राजकुमारी साहू हिचे इतर लोकांशी असलेलं बोलणे आणि त्यांच्या लग्नात निर्माण होणारे अडथळे यातूनच त्याने हे हत्याकांड घडवून आणल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. ही घटना छत्तीसगड राज्याच्या रायपूर जिल्ह्यातील माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.थंड डोक्याने काढला काटा
आरोपी वीरू याने प्रेयसी राजकुमारीची हत्या करण्यापूर्वी योग्य नियोजन केलं होतं. पोलिसांना हत्येचा सुगावा लागू नये, आपल्याविरोधात पुरावे सापडू नये म्हणून वीरूने आधीच आपला मोबाईल घरी ठेवला होता. पोलिसांनी आपला शोध घेऊ नये आणि लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपीनं स्वतःचा मोबाईल बंद करून घरी ठेवला होता.
एवढंच नव्हे तर त्याने पेट्रोल पंपावरून बाटलीत पेट्रोल विकत घेतलं आणि ते स्वतःच्या गाडीच्या डिक्कीत सुरक्षित ठेवलं होतं. सर्व प्लॅनिंग झाल्यानंतर आरोपी पीडितेला घेऊन विमानतळाच्या मागे असलेल्या एका निर्माणाधीन आणि निर्जन रस्त्याकडे नेलं. इथं जुन्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद सुरू झाला. राजकुमारीचा इतरांशी असलेला संपर्क आणि लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमुळे आरोपी आधीपासूनच संतापलेला होता. वाद तीव्र होताच त्याने गाडीच्या डिक्कीतील पेट्रोलची बाटली काढली आणि राजकुमारीच्या अंगावर ओतून तिला थेट पेटवून दिले.
अंगाभोवती आगीचा भडका उडताच राजकुमारी वेदनेनं किंचाळत रस्त्यावर धावू लागली, तर नराधम प्रियकर तिला त्याच अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी विमानतळाच्या एयर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) टॉवरवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या महिलेला पाहिलं आणि तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकही मदतीला धावले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत गंभीर अवस्थेत राजकुमारीला रुग्णालयात दाखल केलं; मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.आरोपीचा गुन्हेगारी इतिहास; आधी सासूवरही केला होता प्राणघातक हल्ला
राजकुमारी ही मूळची समोदा परिसरातील रहिवासी होती. ८ वर्षांपूर्वी तिचा विवाह आरंग भागातील मोखला येथे झाला होता. तिला दोन मुलंही आहेत. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना पाच वर्षांपूर्वी तिची ओळख वीरू धीवरशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. २०२१ मध्ये या अनैतिक संबंधांवरून झालेल्या वादात वीरूने राजकुमारीच्या सासूवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी ‘हत्येचा प्रयत्न’ केल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात जावे लागले होते.
जेलमधून सुटल्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. पुढे राजकुमारी पतीपासून वेगळी झाली. गेल्या दीड वर्षांपासून ती शद्दाणी दरबार जवळील एका कॉलनीत नातलगासोबत भाड्याच्या घरात राहून घरकाम करत होती, तर तिची दोन्ही मुलं पतीसोबत राहत होती. दरम्यान, तिचे वीरू धीवरसोबत प्रेमसंबंध सुरूच होते. या संपूर्ण प्रकरणात माना पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.




