कॉग्रेसकडून मुस्लीम मतांचा फक्त सत्तेसाठी वापर
सिकंदर शहा यांची टिका
लोकसभेत एकही जागा न दिल्याने कॉग्रेस पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत
प्रतिनिधी यवतमाळ
सत्तर वर्षापासून कॉग्रेस मुस्लीम मतांचा फक्त सत्तेसाठी वापर करीत आली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसने 48 पैकी एकही जागा मुस्लीम समाजाला दिली नाही. कॉग्रेसच्या या स्वार्थी नितीमुळे मुस्लीम समाजात तिव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान कॉग्रेसचे माजी मंत्री तसेच स्टार प्रचारक आरीफ नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारक पदाचा नुकताच राजीनामा दिला. आता अशाच प्रकारे राजीनामा सत्र संपुर्ण राज्यात राबविले जाणार असून कॉग्रेसचे सर्वच पदाधिकारी आपला संताप व्यक्त करण्यासाठी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती कॉग्रेसचे पदाधिकारी तसेच शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी दिली आहे.
धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे सांगत कॉग्रेसने मुस्लीमांना आपल्याकडे आकर्षीत केले. मुस्लीम समाजाने सुध्दा सर्वाधिक मतदान कॉग्रेसच्या बाजुने केले आहे. असे असले तरी मुस्लीम समाजाचे नेत्रृत्व मात्र त्यांना नको आहे. त्यामुळेच मुस्लीम मतांच्या भरोषावर सत्ता गाजविणारे कॉग्रेसचे नेते या समाजाला उमेदवारी देतांना प्राधान्य देत नसल्याचा आरोप सिकंदर शहा यांनी केला आहे. कॉग्रेसचे नेते आरीफ नसीम खान यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संपुर्ण राज्यात मुस्लीम समाजात अन्यायाविरुध्द जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने मुस्लीम पदाधिकारी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे सादर करणार आहे. आरीफ नसीम खान यांनी दिलेल्या राजीनाम्याला सुध्दा समाजातून समर्थन दिले जात आहे. विशेष म्हणजे राज्यात जवळपास अडीच कोटी मुस्लीमांची संख्या असतांना हा समाज अत्यंत गरीबीचे जीवन जगत आहे. त्यांच्या प्रगतीकरीता चांगल्या योजना नाही तसेच निधीही दिला जात नाही. फक्त मतांचा वापर करुन मुस्लीम समाजाला हलाखीचे जीवन जगण्यास मजबूर केल्या जात असल्यामुळे समाजात असंतोष पसरला असल्याचे सिकंदर शहा यांनी म्हटले आहे.
कॉग्रेस, भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजु
कॉग्रेस तसेच भाजपा हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. भाजपा धार्मीक तेढ निर्माण करुन तर कॉग्रेस फक्त मतांचा वापर करीत मुस्लीम समाजावर अन्याय करीत आहे. हे दोन्ही पक्ष मुस्लीम समाजाचे नेत्रृत्व बनूच नये याकरीता प्रयत्न करीत असतात. त्यामुळेच राज्यात एकाही जागेवर मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्यात आली नसल्याचे सिकंदर शहा यांनी म्हटले आहे.