हळदीची सुरू होती धामधूम वधूला आला चक्कर अन्….

नाशिक शहरात रविवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दीपशीखा गिरीश गोडबोले असे २९ वर्षीय मयत वधूचे नाव आहे. त्या मुंबईतील दादर-माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ राहत होत्या.
नेमकं काय घडलं?
दीपशीखा यांचा विवाह गंगापूर गावापासून जवळच एका आलिशान रिसॉर्टमध्ये होणार होता. यासाठी वऱ्हाड मुंबईहून दाखल झाले होते. मात्र हॉटेलमधील खोली क्रमांक २०१ मध्ये नातेवाईकांसोबत असताना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपशीखा चक्कर येऊन पडल्या.
कशामुळे मृत्यू झाला?
लग्नमुहूर्तासाठी तयार होत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आहे. मात्र आदल्या रात्रीचे जागरण, लग्नाची दगदग यामुळे प्रकृती वरखाली होत असल्याचा समज करुन त्यांनी दुर्लक्ष केले होते. परंतु साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपशीखा चक्कर येऊन पडल्या आणि गोंधळ उडाला.
कुटुंबावर शोककळा
जिच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचं स्वप्न पाहत होतो, तिला अशाप्रकारे अखेरचा निरोप द्यावा लागत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले. गोडबोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील गोडबोले कुटुंब राहत असलेल्या परिसरावरही शोककळा पसरली असून दीपशिखा यांचे मित्र, सहकारी, नातलग यांना अश्रू अनावर झाले आहेत.
त्याच रिसॉर्टमध्ये वधूपित्याचा मृत्यू
दुर्दैवी योगायोग म्हणजे नाशिकमधील याच रिसॉर्टमध्ये जेमतेम एक आठवड्यापूर्वी वधूपित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.




