इकडे भाजपात आनंद तर सोलापूर मध्ये भाजपाला खिंडार
गाड्यांचा ताफा तेलंगणा कडे रवाना.
सोलापूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
एकीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्याने आणि अजित दादांनी आपल्या आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकार मध्ये प्रवेश केल्यावर राज्यात भाजपा च्या मोजक्या नेत्यांसह कार्यकर्ते आनंदी होते. पण सोलापूर मधून भाजपला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. भाजपचे नागेश वल्याळ आणि पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सचिवा सह 300 कार्यकर्ते BRS ( भारत राष्ट्रनिर्माण समितीत ) प्रवेश घेणार आहेत. त्यासाठी गाड्यांचा ताफा हैदराबाद कडे रवाना झाला आहे. हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याचे फलित मानले जात आहे.
गत चार महिन्यांपासून केसीआर यांचे सोलापूरवर विशेष लक्ष आहे. सोलापुरात सुमारे पाच लाख तेलुगूजन असल्याचे हेरून त्यांचा सोलापूर शहरात बीआरएसची प्रभावीपणे उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे माजी खा. धर्मण्णा सादूल हे बीआरएसच्या गळाला लागले खरे पण शहरातील राजकीय दिग्गज नेते, समाजघटकही काबीज करणे बीआरएसचे लक्ष्य होते. पण या पक्षाला या संदर्भात यश येत नसल्याने सोलापुरात बीआरएस रुजेल का याविषयी साशंकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केसीआर यांनी पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी दर्शनाच्या निमित्ताने अख्खे मंत्रिमंडळ, आमदार- खासदार आदींसह सोलापूरची वारी केली.
देवदर्शनाचे निमित्त असले तरी प्रत्यक्षात पंढरपूरचे युवा नेते भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमदेखील या दौर्यात होता.
भालके यांच्या कार्यक्रमानंतर सरकोली येथून थेट तुळजापूरला जाण्याऐवजी केसीआर थेट पुन्हा सोलापूर शहरात येऊन राजकीय खलबते केली. भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या घरी जाऊन त्यांनी भाजपच्या एकूण पाच नगरसेवकांना बीआरएसची ऑफर दिली. यानुसार वल्याळ यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे गत दोन महिन्यांपासून बीआरएस प्रवेशाबाबत संभ्रमावस्थेत असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांनीदेखील बीआरएसचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला.
वल्याळ, गोप हे दोन पूर्व भागाचे दिग्गज सुमारे 300 समर्थकांना घेऊन शनिवारी हैदराबादमध्ये जाऊन बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. हैदराबादमधील बीआरएसच्या कार्यालयात दुपारी चार वाजता प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील राजकीय उलथापालथीचा आगामी काळात कोणाला फटका बसणार याविषयी उत्सुकता आहे.