बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्यांना मिळाली उद्योजक होण्याची प्रेरणा
आर्वी / प्रकाश निखारे
आर्वी येथील कन्नमवार विद्यालयात सकाळी ८ ते ११ या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचा बाजार भरवत बाल आनंद मेळावा साजरा केला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक,आर्थिक बाबीची जाण व्हावी, समाजाचे ज्ञान मिळावे, बिन भिंतीच्या शाळेतील ज्ञान प्राप्त व्हावे, व्यवहार कुशलता कळावी, यासाठी कन्नमवार विद्यालयात बाल सप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी देखील आनंद मेळाव्यात सहभागी होऊन सुखी भेळ, मटकी भेळ, भजी, पाणीपुरी, चिंच भेळ, हिरवा ताजा भाजीपाला, फ्रुटी आदींचे स्टॉल लावले होते. बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून मुलांना उद्योजक होण्याची प्रेरणा मिळाली. तसेच समाजात वावरण्याची जाणीव निर्माण होऊन मालाची खरेदी विक्री केल्याने गणितीय व्यवहाराचे ज्ञान प्राप्त झाले. यातून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन शाळेविषयी गोडी निर्माण होत असल्याने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. सकाळी आठ वाजताच या चिमुकल्याच्या गजबाजाटीने त्या शाळेला बाजाराचे स्वरूप आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतात पिकणारा हिरवा ताजा भाजीपाला, फळे तसेच स्वतःच्या घरी बनवलेले विविध खाद्यपदार्थ वडापाव, भेळ, गुडदाणी, खारमुरे, पोहे, सुशीला, पॅटीस, पाणीपुरी, सँडविच, दाबेली, सर्व प्रकारची फळे, इत्यादी विविध वस्तू घरून तयार करून आणल्या. वस्तूंची विक्री झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व ओसांडून वाहत होता. गावातील नागरिकांनी या उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारत बोलके केले आणि या आनंदात सहभागी झाले. एवढंच नव्हे तर गावातील वृद्धांनी या बाजाराला हजेरी लावली आणि बाजारातील सर्वच पदार्थ हा हां म्हणता विक्री झाले. विद्यार्थ्यांनी आणलेला सर्व माल गावकऱ्यांनी अतिशय उत्साहाने व खेळीमेळीच्या वातावरणात खरेदी केला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी पन्नास पेक्षा जास्त स्टॉल मांडले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रत्यक्ष व्यावसायिक क्षेत्रातील ज्ञान, अनुभव व आर्थिक धडे मिळावे म्हणून या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन आदर्श कलाध्यापक प्रकाश निखारे यांनी आयोजन केले होते. आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ,शाळेतील सर्व मुलांनी या बाजाराला भेट देऊन खाऊचा आनंद घेतला. बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मला अर्पण करून उद्घाटन करण्यात आले,अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक हिराचंद रेवतकर, प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक कपिल ठाकूर , यांनी सरस्वतीची पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटनदिपक ठाणेकर, अजय खंडाईत, विलास बोरगमवार,दिलीप जाधव, प्रकाश निखारे,आशिष गुजरकर, वृंदा दामले, शाईन बाजी, प्रेमलाल उराडे, कुलभूषण ठाकरे,यांच्या उपस्थितीत पार पडला