मनीष गुप्ता प्रकरणाला अनैतिक संबंधाची झालर


व्यावसायिक असलेल्या मनीष गुप्ता (45) याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या पत्नीने निहारिका गुप्ता हिने चाकूने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर 11 दिवसांच्या उपचारांनंतर मनीष यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला हा वाद घरगुती वाटत असला, तरी आता या प्रकरणात अनैतिक संबंधांचा अँगल समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी पत्नी निहारिकाला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली असून, पोलीस आता सर्व बाजूने तपास करत आहेत.
निहारिकाला मनीषवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर
मनीष आणि निहारिका यांचा विवाह 2017 मध्ये झाला होता आणि त्यांना एक सहा वर्षांचा मुलगाही आहे. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत सुरू असताना, गेल्या तीन वर्षांपासून निहारिकाचे जम्मूतील एका तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध असल्याचे मनीष यांना समजले. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. 5 जून रोजी पुन्हा एकदा मोबाईलवरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक वळणात झाले. मनीष यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, वादाच्या वेळी निहारिकाचा प्रियकर फोनवर होता आणि त्यानेच निहारिकाला मनीषवर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कानपूरच्या फीलखाना पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.
हुंडाबळीचा खोटा आरोप लावून तक्रार
रुग्णालयात उपचार घेत असताना मनीष यांना शुद्ध आली होती, तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना घडलेल्या घटनेचा तपशील दिला होता. निहारिकाने किचनमधील चाकू आणून मनीष यांच्या पोटावर वार केले होते. वडिलांच्या तक्रारीवरून सुरुवातीला हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, मात्र मनीष यांचा मृत्यू झाल्यानंतर आता हत्येची कलमे लावून पोलीस तपास करत आहेत. आरोपी निहारिकाने दीड वर्षांपूर्वी हुंडाबळीचा खोटा आरोप लावून तक्रार केल्याची माहितीही समोर आली आहे, ज्यामुळे वादाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येते.
या दुर्दैवी घटनेचा सर्वाधिक फटका त्यांच्या सहा वर्षांच्या निष्पाप मुलाला बसला आहे. वडील आता या जगात नाहीत आणि आई जेलमध्ये असल्याने, एका हसत-खेळत्या मुलाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील तांत्रिक पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्सची सखोल चौकशी करत आहेत, जेणेकरून फोनवर असलेल्या त्या व्यक्तीची भूमिका स्पष्ट होईल. या गुन्ह्यामागे केवळ संताप होता की एखाद्या नियोजित कटाचा भाग होता, हे तपासाअंती स्पष्ट होईल.




