हटके

14 दिवसात 500 भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देत केले ठार, पोलिसांनी सुरू केली चौकशी

Spread the love
निवडणुकी दरम्यान देण्यात आलेले आश्वासन पाळण्यासाठी हा उपद्रव केल्याचा पोलिसांचा अंदाज
तेलंगणा / विशेष प्रतिनिधी 
                      
मागील 14 दिवसात 500 भटक्या कुत्र्यांना ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन आठवड्यात या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देत ठार करण्यात आलं. तेलंगणात ही घटना घडली असून, पोलिसांनी भटक्या कुत्र्यांच्या सामूहिक हत्येची दखल घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी हनमकोंडा आणि कामारेड्डी जिल्ह्यांतील सात ग्रामप्रमुखांसह 15 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
स्थानिक निवडणुकीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गावांतून पूर्णपणे नाहीसा करु असं आश्वासन देण्यात आलं होतं. हे आश्वासन पूर्ण करण्याच्या हेतूनेच आरोपींनी ही सुनियोजित हत्या मोहीम आखल्याचा आरोप आहे. स्थानिक वृत्तांनुसार, अलीकडील ग्रामपंचायत निवडणुकांदरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांना अनेक उमेदवारांनी ‘कुत्रा-मुक्त गाव’ करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र उमेदवारांनी आश्वासन पूर्ण कऱण्यासाठी चुकीचा मार्ग वापरल्याने त्याची चर्चा रंगली आहे.
कुत्र्यांना एक प्राणघातक इंजेक्शन देण्यात आलं, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. जगित्याल जिल्ह्यातील धर्मापुरी नगरपालिकेतील अशाच घटनेच्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती कुत्र्याला विषारी इंजेक्शन टोचताना दिसला. एका मिनिटातच तो कुत्रा कोसळतो. यावेळी रस्त्यावर इतर दोन कुत्र्यांचे मृतदेहही दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी या नगरपालिकेत किमान 50 कुत्र्यांना ठार मारण्यात आले. दरम्यान, हनमकोंडा येथे, शायमपेटा येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने 110 कुत्र्यांचे मृतदेह खणून काढल्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी त्यापैकी काही मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे.
पोलिसांच्या तपासात हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या 15 प्रमुख व्यक्तींची ओळख पटली आहे. श्यामपेट, आरेपल्ली आणि पालवंचा परिसरासह विविध गावांमधून नुकतंच निवडून आलेले सात सरपंच, यांच्यावर श्वानांच्या हत्येचे आदेश दिल्याचा आरोप आहे.
ग्रामपंचायतीचे सचिव आणि कर्मचाऱ्यांनी या हत्याकांडासाठी आवश्यक व्यवस्था केल्याचा आणि त्यासाठी व्यावसायिक कुत्रे पकडणाऱ्यांना कामावर ठेवल्याचा आरोप आहे. विषारी इंजेक्शन आणि विषारी खाण्याद्वारे हत्या करण्यासाठी तीन खाजगी कंत्राटदारांना नियुक्त करण्यात आलं होतं, असंही म्हटलं जात आहे.
हनमकोंडा पोलिसांच्या मते, कुत्र्यांना ‘अज्ञात विषारी पदार्थ’ टोचून निर्जन ठिकाणी टाकल्याच्या भयंकर दृश्यांमुळे या तपासाला सुरुवात झाली. सर्व 15 व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३२५ (प्राण्यांची हत्या करणे किंवा त्यांना विष देणे) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असले तरी, पोलिसांनी सात सरपंचांना नोटिसा बजावल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “कायद्याचे अज्ञान हे कोणतेही कारण असू शकत नाही,” आणि स्थानिक स्वराज्य संस्था केंद्र सरकारच्या प्राणी जन्म नियंत्रण (ABC) नियमांना डावलू शकत नाहीत, यावर त्यांनी भर दिला.
विषारी पदार्थाचे नेमके स्वरूप निश्चित करण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत, ज्यामुळे धोकादायक रसायनांच्या अवैध ताब्याशी संबंधित पुढील आरोप जोडले जातील की नाही हे निश्चित होईल.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close