पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याचा गावकऱ्यांना फटका
अर्धवट पूल गेला वाहून ; आजारी मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी तारेवरची कसरत
पावसाळा सुरू होऊन जवळपास दिड महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण अनेक भागात पाहिजे तसा पाऊस पडला नाही तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडला आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अश्यातच कोसमतोंडी – बोळूदा गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम संथगतिने सुरू असल्यानेच ही परिस्थिती ओढावल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. .
गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी-बोळूंदा या दोन गावांना जोडणाऱ्या एकमेव पुलाचे बांधकाम मागच्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. पुलाचे बांधकाम सुरु असल्याने पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी बनवण्यात आला. मात्र मागील 24 तासात गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. त्यात कोसमतोंडी-बोळूंदा या दोन गावांना जोडणारा पूल पुरात वाहून गेला. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
आधीच दुर्गम भाग, त्यात जोरदार पाऊस आणि पूल वाहून गेल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आजारी पडलेल्यांना उपचारांसाठी दवाखान्यात नेतानाही मोठी कसरत करावी लागत आहे.
वडिलांना आजारी मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी करावी लागली कसरत
बोळूंदा इथल्या रवी कापगते यांच्या चार वर्षीय चिमुकल्याची प्रकृती बिघडली. त्याला उपचारांसाठी कोसमतोंडी या गावात घेऊन जायचे होते. परंतु या गावांना जोडणारा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना या रस्त्यावरुन मोठी कसरत करावी लागली. विशेष म्हणजे पूल वाहून गेल्यानंतर कुठलेही मदतकार्य प्रशासनाच्या वतीने किंवा संबंधित कंत्राटदाराच्या वतीने करण्यात आले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.


