मणिपूरमधील हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराला बिजेपी सरकारच जबाबदार
भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेतून नाना पटोले यांनी केले आरोप.
राजू आगलावे (जि.प्र)
नव प्रहार/भंडारा
भंडारा- भाजपाला सत्तेची मस्ती आली असुन, बीजेपी संवेदनशील नाही, भाजपाला मनुवाद चालवायचा आहे असे अनेक आरोप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करित,मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार व महिलांवर झालेल्या अत्याचाराला सुद्धा बीजेपी सरकार जबाबदार असल्याचे सांगत, शनिवारी भंडारा येथील शासकिय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेतून आरोपकरित तोफ डागली.
यावेळी पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले मागील ८० दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर देशाचे पंतप्रधान मौन ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत विदेश दौऱ्यावर असतात.त्यामुळे एवढ्या संवेदनशील विषयावर त्यांना भाष्य करायला वेळ नाही. नुकत्याच महिलांवर झालेल्या अत्याचारानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर हा अत्याचार पसरला. त्यानंतर सर्वत्र व जागतिक स्तरावर निषेध झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियासमोर येऊन दोन शब्द बोलून औपचारिकता पूर्ण केली. तसेच मीडियाच्या प्रश्नांचे उत्तर न देता निघून गेले. त्यानंतर मणिपूरच्या हिंसाचारावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भूमिका मांडल्यावर भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी त्यांच्यावर टीका करून हे सिद्ध केले की, त्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. ही न्यायव्यवस्था मोडून काढण्याचा प्रकार भाजपातर्फे केला जात आहे. हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. जे पंतप्रधान आतापर्यंत मणिपूर -सारख्या हिंसाचारात मौन होते, ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी अशी खंत व्यक्त केली.
पत्रपरिषदेला भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.