सर्व्हर डाऊन असल्याचा फटका शाळकरी , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पालकांना
तीन दिवसांपासून क्रिमीलेअर प्रमाणपत्रासह विविध दाखले मिळविण्यासाठी नागरिकांची पायपीट
सर्व्हर डाऊन, सेतु केंद्राचे कामकाज ठप्प
अमरावती : कैलास कुलट
तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे जिल्हाभरातील सेतु केंद्रांचे कामकाज ठप्प झाले आहे.दुसरीकडे विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी केंद्रांवर नागरिकांच्या लांब रांगा लागत आहेत. हल्ली शाळा,
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कागदपत्रे तयार करण्याची एकच लगबग सुरू असताना सेतु केंद्रातील कामकाज ठप्पचा मोठा फटका त्यांना बसत आहे. राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे. यात विविध योजना, दाखले, अनुदान, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, केंद्रीय जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,ईडब्ल्यूएस आरक्षण, उत्पन्नाचा दाखला, शेतकरी प्रमाणपत्र एसईएस प्रमाणपत्र आदी मिळण्यासाठी
नागरिकांना सेतु केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कामकाजात पारदर्शकता आणि
वेळेच्या आत कामे व्हावी, हा सेतु
केंद्राचा उद्देश आहे. मात्र, गत तीन दिवसांपासून अमरावती महानगरातील सेतू केंद्रांना सर्व्हर डाऊनचा मोठा फटका बसत आहे. प्रत्येक सेतु
केंद्रांबाहेर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत असून केंद्र संचालकांना त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
अमरावती महानगरात अंजाजे १५० च्या जवळपास सेतु केंद्रे असल्याची माहिती आहे.
बुधवारी सेतु केंद्राच्या संचालकांनी भेट घेतली.
विद्यार्थ्यांना प्रवेशात अडथळा सेतु केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेताना मुलांना प्रचंड त्रास होत आहे. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र,उत्पन्नाचे दाखले तयार होत नसल्यामुळे प्रवेशात अडथळे निर्माण होत आहेत. विविध दाखल्यांसाठी
मुलांसह पालकांचीही कसरत होत आहे. अकरावी, बारावी प्रवेशासह महाविद्यालयीन प्रवेशावरही परिणाम जाणवत आहे. सर्व्हर डाऊनची समस्या
कायमस्वरूपी निकाली काढावी, अशी मागणी सेतू केंद्र संचालकांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे.