मोठया प्रमाणात आयातीमुळे कापसाचे भाव पडले – अनिल देशमुख
उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदील
नागपूर, प्रतिनीधी /अमित वानखडे
मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने राज्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात कापसाचा पेरा केला. परंतु अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन हे कमी झाले. देशातील कापड उदयोगाला फायदा मिळण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दबावाखाली येवून मोठया प्रमाणात विदेशातुन कापसाची आयात करण्यात येत असल्याने देशाअंतर्गत कापसाचे भाव पडले असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख केला आहे.
राज्यात २०२१ – २२ च्या हंगामात जवळपास ३९.३६ लाख हेक्टर मध्ये कापसाचा पेरा झाला होता. खुल्या बाजारात याच वर्षी कापसाला १२,५००/- रुपये भाव मिळाला होता. चांगला भाव मिळाल्यामुळे २०२२ – २३ च्या हंगामात राज्यात ७ टक्के कापसाचा पेरा वाढुन तो ४२.११ लाख हेक्टर पर्यंत पेरा झाला होता. यावर्षी सुध्दा मागील वर्षीसारखाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु मोठया प्रमाणात कापसाची आयात झाल्याने देशातंर्गत कापसाचे भाव पडले.
यावर्षी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकार वर दबाव निर्माण करुन कापुस व सुताचा तुटवडा असल्याचा हवाला देत सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२२ च्या काळात कापसावरील आयातीवर असलेले ११ टक्के शुल्क हे माफ करण्यात आले. यामुळे कापड उदयोजकांनी मोठया प्रमाणात कापसाच्या गाठी या विदेशातून आयात केल्या. शुल्क माफ कराताच १२ लाख गाठींची आयात करण्यात आली. तसेच नुकतेच काही दिवसांपुर्वी परत ४ लाख गाठींची विदेशातून आयात करण्यात आली. मागील वर्षी ४३ लाख गाठी निर्यात झाल्या होता. परंतु यावर्षी केवळ ३० लाख गाठी निर्यात करण्यात आला. जवळपास मागील वर्षीच्या तुलनेत १३ लाख गाठीची निर्यात कमी झाली. यामुळेच देशातंर्गत कापसाचे भाव पडले आहे.
सध्या बाजारात कापसाला ६,५००/- ते ६,८००/- भाव मिळत आहे. यातून साधा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. दुसरीकडे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणला नाही. घरात बराच दिवसापासून कापूस असल्याने सध्या त्याची प्रत सुध्दा घसरली आहे. इतकेच नाही तर वाढत्या तापमाणामुळे कापसाच्या वजनात सुध्दा घट झाली आहे. बऱ्याच दिवसापासून कापूस घरात असल्याने त्यात पडलेल्या किडयांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्वचेच्या रोगाच्या सुध्दा समस्या अनेक भागात निर्माण झाल्या आहेत..