सामाजिक

श्रीअन्न निरंतर हे निरंतर चालणाऱ्या मिशनची चांगल्या आरोग्यासाठी भविष्याची गरज- – अपर मुख्य सचिव (कृषि) श्री. अनूप कुमार

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी(विलास गिर्‍हे ) :—
देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या हरितक्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो. त्यामुळे अन्नाची शाश्वतता झाली. गहू व तांदुळाचा वापर आपल्या आहारात वाढल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या. आपली पूर्वीची खाद्य संस्कृती बदलल्यामुळे आपल्याला आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. पूर्वीच्या सिंधु संस्कृतीमध्ये बाजरी वापराचा उल्लेख आढळतो. आद्य संस्कृतीमध्येही हीच खाद्य संस्कृती श्रेष्ठ मानली जात होती. पौष्टिक तृणधान्य पिकविणार्या शेतकर्याला दोन पैसे अधिक मिळावेत आणि त्याचबरोबर शहरातील ग्राहकालाही तृणधान्य वाजवी दरात उपलब्ध व्हावी. आपणा सर्वांना आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढवावा लागणार आहे. त्याकरीता श्रीअन्न निरंतर हे ब्रिद समोर ठेवून निरंतर चालणार्या मिशनची चांगल्या आरोग्यासाठी भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अनूप कुमार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त शाश्वत श्रीअन्न शेती या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. अनूप कुमार बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन बीजमाता पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, राज्याचे विस्तार व प्रशिक्षण कृषि संचालक श्री. दिलीप झेंडे, आत्माचे संचालक डॉ. दशरथ तांभाळे उपस्थित होते. राज्याचे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अनूप कुमार आणि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या की आपले मुख्य अन्न हे भरडधान्यच असावे, तेच आपण आपल्या शेतात पिकवावे व तेच खावे. मी केलेले काम प्रत्येक शेतकर्यापर्यत जायला हवे. प्रत्येक गावात राहिबाई तयार व्हावी असा आशावाद त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाने ज्वारी, बाजरी तसेच नाचणी, बर्टी, वरई यासारख्या पौष्टिक तृणधान्य पिकांचे उन्नत वाण व तंत्रज्ञान आणि रब्बी ज्वारीची पंत्रसूत्री शेतकर्यांसाठी विकसीत केली आहे. पारंपारीक शेतीत भरडधान्याचे खुप महत्व आहे. भरडधान्य हे कमी कालावधीत येणारे, कमी पाण्याची आवश्यकता असणारे व लागवडीसाठी खर्चिक नसुन उच्च पोषणमुल्य असणारी व आपल्या पर्यावरणासाठी महत्वाची आहेत. आता आपल्याला अन्न सुरक्षिततेकडून पौष्टिक अन्न सुरक्षिततेकडे जायचे आहे. श्री. दिलीप झेंडे यांनी पौष्टिक तृणधान्य या विषयावर सादरीकरण केले. या कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य पुस्तिका व विविध घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी भरड व तृणधान्याच्या कणसांपासून बनविलेला गुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी सहा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्वारी व बाजरी, नाचणी व बरी, वरई व कोडो, राळा व बर्टी, विपणन, प्रसिद्धी व मूल्य साखळी आणि धोरणात्मक बाबी व भविष्यातील दिशा या विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तांत्रिक सत्रात राज्यातील कृषि विद्यापीठांचे तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या संस्थांचे तृणधान्य पीकविषयक तज्ञ, तसेच कृषि विभागाचे अधिकारी व प्रगतशील शेतकरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सी.एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले. या कार्यक्रमासाठी कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कृषि आयुक्तालय, पुणे येथील सहसंचालक श्री. रफिक नाईकवाडी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. सुधाकर बोराळे, सर्व विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, राज्यभरातून आलेले निमंत्रित शेतकरी तसेच महिला शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close