धानाने भरलेल्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यु वैनगंगा नाडीपुलावरील घटना

पवनी : येथून भेंडाळा(चौ) कडे जाणाऱ्या दोन युवकांची दुचाकी वैनगंगा नदी पुलावर धानाचे पोते भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकल्याने दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ८ वाजे दरम्यान घडली. यातील मृतक युवकांची नावे पियुष गजानन राजभोयर(१७) मु. भेंडाळा(चौ) व निलेश श्रीपत मेश्राम(२४) मु. दहेगाव तह. लाखांदूर अशी आहेत.
प्राप्त माहितीनुसार दिनांक १९ नोव्हेंबरला भेंडाळा(चौ) येथे मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उत्सव बघण्यासाठी मृतक निलेश मेश्राम हा भेंडाळा येथे सोनटक्के यांचे घरी पाहुणा म्हणून आला होता. तो १७ वर्षीय राजभोयर याचा मित्र होता. सायंकाळी दोघेही पवनीला स्प्लेंडर दुचाकीने गेले होते. कामे आटोपून गावाकडे परतत असताना वैनगंगा नदी पुलावर उभ्या असलेल्या गुड्डू रघुते मु. कुर्झा यांच्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळली. यावेळी दोघांनाही गंभीर दुखापत झाली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी उसळली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी भांदवीच्या कलम ३०४(अ) सहकलम १०२(२), १०३, १२२/१७७ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात एसआय निखिल राहाटे करीत आहेत.
पुलावर स्ट्रीट लाईटच्या गरज
दिवसेंदिवस पुलावरील अपघाताच्या घटना वाढत असून याला पुलावरील अंधार कारणीभूत ठरत आहे. ट्रॅक्टरला इंडिकेटर व रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वारास ट्रॅक्टर दिसले नाही व त्यांचा करून अंत झाला. पुलावर प्रकाशाची व्यवस्था असती तर कदाचित अनर्थ टळला असता? म्हणून प्रशासनाने सदर बाब लक्षात घेऊन वैनगंगा नदी पुलावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था लावण्याची मागणी प्रवासी जनतेनी केली आहे.