शेती विषयक

दिवाळीतील गरज भागविण्यासाठी अल्प किमतीत विकावे लागले धान

Spread the love

 

शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतिक्षाच

भंडारा (१५ नोव्हेंबर) : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२३-२४ या पणन हंगामात हमी भावाने धान खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने धान विक्री करावी लागल्याचे वास्तव आहे.
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने ९ नोव्हेंबर रोजी परीपत्रक पणन हंगाम २०२३ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धार खरेदी करण्याचे काढले आहेत. साधारण जातीच्या धानास २१८३ तर अ दर्जाच्या धानास २२०३ रूपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते. त्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या बिगर आदिवासी क्षेत्रात, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व आदिवासी क्षेत्रात, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांच्या मार्फत धान खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने ‘धान’ खरेदीकरीता राज्यात ‘विकेंद्रीत खरेदी योजना’ लागू करण्याबाबत केलेली शिफारस विचारात घेऊन पणन हंगाम २०१६-१७ पासून विकेंद्रित खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मात्र जिल्हास्तरावरून सबंधित संस्थांना अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना आपली दिवाळीची गरज भागविण्यासाठी खाजगी व्यापाऱ्यांना धान विक्री करावी लागली. लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close