दोघींना वाचविण्याच्या नादात तो ही बुडाला : तिघांना जलसमाधी
यवतमाळ / प्रतिनिधी
यावगमाल जिल्ह्यातील सावलेश्वर येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचा तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या दोन मुलांपैकी एक त्यांच्या सोबत बुडाला. यामुळे सावळेश्वर गावावर एकच शोककळा पसरली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. पैनगंगा नदीपात्रात बुडालेल्या मुलींची नावे कावेरी गौतम मुनेश्वर (१५), अवंतिका राहुल पाटील (१४), आणि चेतन देवानंद काळबांडे (१६) असे मुलाचे नाव आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी आणि तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे आटोपल्यानंतर या दोघीही अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या. त्यांनी मदतीसाठी धावा सुरू केला. त्यांची आरडाओरडा ऐकू आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे हे दोघे मदतीसाठी धावले.
तिघांचा मृत्यू, गावकरी हळहळले
या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली. घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले. शुभम याच्यावर प्रथमोपचार करून उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले आहे.
मृतकाच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू
चेतन देवानंद काळबांडे यांच्या वडिलांचा सुद्धा काही दिवसांपूर्वी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हापासून चेतनची आई कविता ही चेतन सोबत राहत होती. आज चेतनच्या अशा अचानक मृत्यूने कविताबाई ही एकाकी पडली आहे. शासनाने तिला योग्य ती मदत करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.