युती नाही , प्रीति संगम – संजय राऊत

राज ठाकरे कडून युतीला घेऊन दोन्ही पक्षाच्या नेत्यांना महत्वपूर्ण सूचना
मुंबई / विशेष प्रतिनिधी
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेना उबाठा गटात युती होणार आणि दोन्ही ठाकरे बंधू मुंबई बीएमसी सह राज्यात इतर काही ठिकाणच्या निवडणुका एकत्र लढणार अशी चर्चा होती. आता मनसे आणि उबाठा गट एकत्र निवडणूक लढणार आहेत. ही युती नाही तर प्रीती संगम आहे असे वक्तव्य खा.संजय राऊत यांनी केले आहे.
मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंची जवळीक वाढली असून युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. काही जागांवरुन दोन्ही सेनांमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच आता जागावाटपावर थेट राज ठाकरेंनीच एक महत्त्वाची सूचना केल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनच्या युतीबाबत पुन्हा एका दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा झाली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. जवळपास 40 ते 45 मिनिटे दोन्ही पक्षाच्या नेत्यांदरम्यान चर्चा झाली. शिवसेना आणि मनसे युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती राऊत यांनी या भेटीनंतर दिली. जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज पुन्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. दरम्यान, रविवारी एकीकडे राज्यभरातील नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच मुंबईत राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकरांसोबतही राऊत आणि राज यांनी चर्चा केली. या भेटीदरम्यान युतीसंदर्भात पुढील पक्ष धोरण कसं असेल याबद्दल सकारात्मक चर्चा झाली.
या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी जागावाटपावरुन दोन्ही सेनांच्या नेत्यांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना केली. “जागावाटपाची फार रस्सीखेच करू नये,” अशी सूचना राज यांनी दोन्ही नेत्यांना (राऊत आणि नांदगावकर यांना) दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरेंची ही सूचना दोन्ही नेत्यांना पटली असून युतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या चर्चेचा विषय बऱ्याच अंशी संपल्याचं सांगितलं जात आहे.
सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधता संजय राऊत यांनी, “दोन भावांची युती झाली आहे,” असं म्हटलं. तसेच, “राजकीय युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. 23 तारखेपासून अर्ज भरण्याची मुदत सुरू होत आहे. त्यामुळे त्या अगोदर घोषणा केली जाईल,” असं राऊत यांनी सांगितलं. ठाकरे बंधुंच्या युतीबद्दल बोलताना, “हा एक नवीन प्रयोग आहे. हे नाटक नाहीये. हा प्रीतिसंगम आहे महाराष्ट्रातील जनतेचा प्रीतिसंगम आहे,” असं राऊत म्हणाले.
ठाकरे बंधुंच्या युतीची उद्या म्हणजेच मंगळवारी (23 डिसेंबर रोजी) घोषणा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेवून घोषणा करणार असल्याचं समजतं. मराठी भाषेसाठी राज आणि उद्धव 19 वर्षानंतर ज्या मंचावर एकत्र आले त्याच एनएससीआय डोममध्ये मंगळवारी ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




