संख्याबळ कमी असतांना देखील बच्चू कडू अध्यक्ष पदावर विराजमान
काँग्रेस ला हादरा देणारा निकाल
अमरावती / पी.संजू
शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी म्हणविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी यशोमती ठाकूर यांना धोबी पछाड देत अध्यक्ष पद काबीज केले आहे. या काँग्रेस पक्षासाठी मोठा हादरा मानला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेस चे तीन मतदार फुटल्याची चर्चा आहे.
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाडी समजल्या जाणारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेसचे संख्या बळ जास्त असून सुद्धा माजी मंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी खेळी खेळत काँग्रेसची तीन मते आपल्याकडे वळवत अध्यक्षपद खेचून आणले…
आज झालेल्या निवडणुकीत बच्चू कडू गटातर्फे बच्चू कडू स्वतः अध्यक्षपदासाठी तर सहकारातील नेते अभिजीत ढेपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते. बच्चू कडू व अभिजीत ढेपे या दोघांनाही 11-11 मते मिळाली तर काँग्रेसचे यशोमती ठाकुर व बबलू देशमुख गटाचे उमेदवार माजी आ.वीरेंद्र जगताप व हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही दहा दहा मते मिळाली.
काँग्रेसची या निवडणुकीत तीन मते फुटून ती बच्चू कडू यांच्या कडे वळल्या गेली त्यामुळे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या गटाला हा जबर धक्का असल्याचे बोलल्या जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एक हाती सत्ता होती.
शेतकऱ्यांना व संचालकांना त्रास देणाऱ्या हुकूम शहांची हुकूमशाही संपवली व जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.