यु. जी. सी च्या त्या आत्मघातकी निर्णयाचा विचार व्हावा!* – प्रा. डाँ. बबन मेश्राम
प्रकरण महाविद्यालयात व विद्यापिठात वर्षातून दोनवेळा प्रवेश
प्रक्रिया
विद्यापिठ अनुदान आयोगाचा निर्णय
भंडारा- / प्रतिनिधी
कमकुवत भारतातील शिक्षण व्यवस्थेसमोरील प्रश्न जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे आहेत. प्रचंड मोठी विद्यार्थीसंख्या, अनेक भाषा, गुणवत्तेचे असमान परीक्षण, उपलब्ध संधी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाचा दर्जा. या जटिल प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक विचारशक्तीचा अभाव असल्यामुळे विकसित देशांतील शिक्षणव्यवस्थेचे अनुकरण करत आपण कसे प्रगत होत चाललो आहोत, हे दाखवण्याची स्पर्धाच दिसून येते. देशातील महाविद्यालयांमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश देण्याची मुभा देणारा विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) निर्णय या प्रकारातील आहे. वर्षातून एकदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशी व्यवस्था नसताना अशा प्रकारे दोन वेळा प्रवेश देणे, म्हणजे दोन समांतर महाविद्यालये चालवणे आहे, याचे भान विद्यापीठ अनुदान आयोगाला असायला हवे. तसे ते नसल्याने असे आत्मघातकी निर्णय घाईघाईने घेऊन आधीच कमकुवत होत चाललेल्या शिक्षणव्यवस्थेला खिळखिळे करण्याचाच हा प्रयत्न आहे. तेव्हा यु. जी. सी ने त्या आत्मघातकी निर्णयाचा विचार करावा असे प्रखर मत रा.तु.म नागपुर विद्यापिठ समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डाँ. बबन मेश्राम यांनी युजीसी ला पाठविलेल्या निवेदनात केले आहे.
यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानुसार आता देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वर्षातून दोनवेळा प्रवेश प्रक्रिया राबवणे शक्य होणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होताना, म्हणजे जुलै-ऑगस्ट आणि शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रात म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्येही प्रवेश प्रक्रिया राबवली जाऊ शकणार आहे. ही व्यवस्था ऐच्छिक असली, तरी येत्या काळात त्याबद्दल आदेश निघणारच नाही, अशी हमी देता येणार नाही.
साधारणपणे जुलैमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात जो अभ्यासक्रम शिकवला जाईल, तोच अभ्यासक्रम दुसऱ्या सत्रात पुन्हा नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याची व्यवस्था करावी लागेल. असे करताना पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात पुढील अभ्यासक्रम शिकवणे भाग पडणार आहे. म्हणजे अध्यापकांना पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात एकच अभ्यासक्रम शिकवत असतानाच, दुसऱ्या सत्रातील पुढील अभ्यासक्रमही शिकवावा लागणार आहे.
माध्यमिक स्तरावर दिवस शाळेबरोबरच रात्रशाळा भरवल्या जातात. रात्रशाळेची व्यवस्था समांतर असते. आता महाविद्यालयांमध्ये जानेवारीत नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच आधीच, मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही शिकवण्याची व्यवस्था करावी लागेल.
म्हणजे अध्यापकांवरील ताण वाढेल किंवा नव्याने अध्यापकांची भरती करावी लागेल. अध्यापकांच्या आहेत त्या जागाही पूर्णपणे भरल्या जात नसताना, नवी भरती स्वप्नवतच! मग हे दोन वर्ग भरवणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होईल का? ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये प्रवेश घेता येऊ शकत नाही, त्यांना नंतरच्या सत्रात प्रवेश घेता येईल, अशी ही व्यवस्था. म्हणजे एकाच वर्षात दोन शैक्षणिक वर्षे. एक जुलै- ऑगस्टमध्ये सुरू होणारे आणि दुसरे जानेवारी फेब्रुवारीमध्ये. म्हणजे एकाच अभ्यासक्रमाच्या दोन परीक्षा. आधीच जगडव्याळ असलेल्या भारतीय शिक्षणव्यवस्थेला हे सारे झेपेल काय?अजून हि नविन शिक्षा निती म्हणजेच एन. ई. पी चा संभ्रम युजीसी, विद्यापिठ, महाविद्यालय, प्राध्यापक याना असतांना पुन्हा नविन निर्णयाने सामान्य विद्यार्थी, शिक्षण व्यवस्थेचे काय होणार?असा हि प्रश्न प्रा. डाँ. बबन मेश्राम यांनी उपस्थित केला आहे.