लोकल मधील महिलांची समय सुचकता आणि मुलगा सुखरूप
मुंबई / विशेष प्रतिनिधी
‘मला तुझ्या मम्मी- पप्पानी घ्यायला पाठवले आहे’ . असे बोलून शाळकरी मुलाला आपल्या सोबत घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर लोकल मध्ये बसलेल्या महिलांना संशय आल्याने त्यांनी मुलाला विचारपुस केल्यावर मुलाने सत्य परिस्थिती कथन केली. आणि त्यानंतर महिलांनी प्रसंगवधन राखून पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी त्याची अनोळखी व्यक्ती कडून सुटका करून त्या इसमाला अटक केली आहे.
इन्स्टाग्रामवर @amchi_mumbai नावाच्या एका पेजवरून मुंबई लोकलने शाळकरी मुलाला किडनॅप करून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ पकडल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये संपूर्ण घटना सांगण्यात आली आहे. तसेच पालकांना, मुलांना शाळा, क्लासेसला एकट्याने सोडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
कॅप्शनमधील माहितीनुसार, कर्जतवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ४ मार्च २०२४ रोजी एक अनोखळी व्यक्तीने शाळेतून सुटलेल्या एका लहान मुलाला ‘तुझा आई-वडिलांनी मला आणायला पाठवलं आहे’, असे सांगून थेट सीएसएमटी स्टेशनवर घेऊन जात होता. त्या लहान मुलाला तो लेडीज डब्यातून घेऊन जात होता.
यावेळी विक्रोळी स्थानकात उतरणाऱ्या काही महिलांनी त्या लहान मुलाची सहजपणे विचारपूस केली. यावेळी बोलता- बोलता काही वेळाने महिलांना त्या अनोखळी व्यक्तीवर संशय आला. ज्यानंतर त्या लहान मुलाने त्याबरोबर नेमकं काय घडलं ही सत्य घटना महिलांना सांगितली. यावेळी विक्रोळी रेल्वे पोलिसांनी काळजीपूर्वकपणे लक्ष देऊन त्या अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेतले.
सदर घटनेतील अनोळखी व्यक्ती त्या शाळकरी मुलाला फसवून पळवून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र मुंबई लोकलमधील काही महिलांच्या प्रसंगावधानाने त्या व्यक्तीचा प्लॅन फसला, यानंतर महिलांनी त्याला विक्रोळी स्थानकात पोलिसांच्या ताब्यात दिले.
पण, या घटनेनंतर तरी पालकांनी मुलांना शाळेतून, क्लासेस किंवा कुठेही बाहेर एकटं पाठवताना काळजी घेतली पाहिजे, तसेच सावधान राहिले पाहिजे, असे आवाहन यातून केले जात आहे. परंतु, या घटनेबाबत सोशल मीडियावरील अनेक युजर्स विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. तो अनोळखी व्यक्ती त्या शाळकरी मुलाच्या ओळखीचा होता का किंवा त्याने त्या मुलाला कशाप्रकारे फसवणूक आणलं अशाप्रकारचे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.