एक्झीट पोल च्या अंदाजामुळे ठाकरे बंधूंना धक्का..

मुंबई / विशेष प्रतिनिधी
राज्यात २९ महानगर पालिकेमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले. जनतेची सगळ्यात जास्त नजर आहे ती मुंबई महानगर पालिकेच्या निकालाकडे. कारण या निवडणुकीत मागील २० वर्षाचे वैर बाजूला ठेवून ठाकरे बंधू एकत्र आले होते.आणि त्यांनी निवडणूक देखील एकत्र लढवली. त्यामुळे मागील २५ वर्षाची सत्ता कायम ठेवण्यात ठाकरे बंधू यशस्वी ठरतील असे सगळ्यांना वाटत होते. पण भाजपने देखील बीएमसी हातात घेण्याचा जणू चंगच बांधला होता. एक्झीट पोल कडून वर्तविण्यात येत असलेल्या अंदाजानुसार बीएमसी मध्ये भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनीही ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेऊन भाजपला मात देण्यासाठी राज ठाकरे यांची साथ घेतली. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला झटका बसेल, असे अनेकांचे म्हणणे होते. परंतु एकाच परिसरात म्हणजेच मराठी बहुल भागांतच सेना-मनसेची ताकद असल्याने आणि मुस्लिम बहुल-उत्तर भारतीय भागांत फारसा प्रतिसाद न मिळाल्याने ठाकरे बंधूंची मजल ६०-७० च्या पुढे जाणार नसल्याचा अंदाज सगळ्याच आघाडीच्या मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल, असे अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवले आहेत.
मुंबईच्या सत्तासंघर्षात ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. परप्रांतियांशी आमचा काहीही वाद नाही. मात्र मुंबईत मराठीच, असा प्रचार संपूर्ण निवडणूक काळात ठाकरेंकडून करण्यात आला. दुसरीकडे मुंबईचा महापौर हिंदूच होईल, असे सांगून शिवसेनेच्या हिंदुत्वावर भारतीय जनता पक्षाने प्रश्नचिन्ह निर्माण केले. विकासाचा मुद्दा सांगून त्याला हिंदुत्वाची जोड देण्याचा प्रयत्न भाजपने प्रचार काळात केला. ठाकरे बंधूंची मदार मराठी बहुल भागांवर जास्त होती, त्याउलट भारतीय जनता पक्षाची भिस्त उत्तर भारतीय बहुल आणि मुंबईतल्या पूर्व भागावर (गुजराती-मारवाडी) होती. अशावेळी मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी मुस्लिम, मराठी, उत्तर भारतीय आणि दलित मतदारांची कृपा ज्याच्यावर राहिल, त्याला सत्तेत जाणे सोपे होईल, हे स्पष्ट होते. मात्र भारतीय जनता पक्षाने हे समीकरण अगदी व्यवस्थितपणे सोडविल्याचे मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष सांगतात. काँग्रेस वेगळी लढल्याने दलित आणि मुस्लिमांच्या मतात विभागणी झाल्याचा फटका आणि उत्तर भारतीय मतदार भाजपच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याच्या मुद्द्यावर निवडणूक फिरल्याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला.मराठी मते पूर्ण क्षमतेने वळविण्यात ठाकरे बंधूंना अपयश
अॅक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार, ठाकरे बंधूंना ४९ टक्के मराठी मतदारांनी साथ दिली. तर ३० टक्के मतदारांनी भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवला. काँग्रेसला ८ टक्के मराठी मतदारांनी साथ दिली. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवूनही मराठी मतांत फूट पडल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मराठी मते पूर्ण क्षमतेने वळविण्यात ठाकरे बंधूंना अपयश येऊ शकते, असा निष्कर्ष अॅक्सिस माय इंडियाच्या पोलने काढला आहे.काँग्रेस वेगळी लढल्याने दलित आणि मुस्लिमांच्या मतात विभागणी, ठाकरेंना फटका
काँग्रेस आणि ठाकरे वेगळे लढले तर दलित आणि मुस्लिमांच्या मतात विभागणी होऊन ठाकरे बंधूंना फटका बसू शकतो, असे सगळ्यांनाच वाटत होते. मतदानोत्तर चाचण्यांनी देखील हाच मुद्दा अधोरेखित करीत दलित आणि मुस्लिमांच्या मतात विभागणी झाल्याने त्याचा सर्वाधिक तोटा ठाकरेंना झाल्याचा अंदाज वर्तवला. मुस्लिम बहुल आणि दलित मतदारांचे अधिक प्राबल्य असलेल्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित, एआयएमआयएम, समाजवादी पक्षांची मतांसाठी प्रचंड चुरस होती. हीच मते विविध पक्षांत विभागली गेल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेनेला फायदा होऊ शकतो, असे मतदानोत्तर चाचण्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसकडे ४१ टक्के मुस्लिम, शिवसेना ठाकरे गटाकडे २८ टक्के मुस्लिम, भाजपकडे १२ टक्के मुस्लिम गेल्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ मुस्लिमांच्या मतात मोठी फूट पडली. त्याचा जबरदस्त फटका ठाकरे बंधूंना बसू शकतो.उत्तर भारतीय मतदार भाजपच्या मागे खंबीरपणे
मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी आल्याने मुंबईतला उत्तर भारतीय मतदार भाजपकडे जाणार हे स्पष्ट होते. आकडेवारीनुसार तब्बल ६८ टक्के उत्तर भारती मतदारांनी भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केल्याचे सर्व्हेचे म्हणणे आहे. केवळ १९ टक्के मतदार ठाकरे बंधूंकडे वळाले तर एकेकाळी काँग्रेसची हक्काची व्होटबँक असलेल्या उत्तर भारतीय मतदारांनी यंदा केवळ २ टक्के मतदान काँग्रेसला दिल्याचे सर्व्हेचे म्हणणे आहे.




