मुसळधार पावसामुळे भूस्खलन ; 30 नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता ,22 लोकांचा मृत्यू
एकाच कुटुंबातील 7 लोकांचा समावेश
15 लोकांना वाचवण्यात यश ; बचाव कार्य युद्धपातळीवर
माचल प्रदेशमधील शिमला येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आहे. समर हिल येथील शिव मंदिर परिसरात भूस्खलन झाले असून 30 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. यामध्ये आतापर्यंतच्या माहितीनुसार, 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
पावसामुळे भूस्खलनाची घटना
शिमला / नवप्रहार मीडिया नेटवर्क
धो धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्यातच घडलेल्या भूस्खलनाच्या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून 22 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.शिमलामधील समर हिल येथे असलेल्या शिव मंदिर परिसरात घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 15 लोकांना वाचवण्यात मदतकार्य करणाऱ्या चमुला यश आले आहे.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशचे आरोग्य मंत्री आणि सोलन विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनीराम शांडिल रविवारी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते.
30 लोक दबल्याची शक्यता : शिमलाच्या समर हिल भागात असलेले शिव बारी मंदिर भूस्खलनात दबले आहे. मंदिराच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 30 लोक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहायक पोलीस अधीक्षक सुनील नेगी यांनी सांगितले की, बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात आले आहे. सर्वांना उपचारासाठी आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान भूस्खलनाची घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक पातळीवरील बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे. ढिगाऱ्याखाली 30 जण दबल्या गेले. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा समावेश आहे. तसेच एकाच कुटुंबाच्या मालकीची दोन घरे आणि एक गोठा ढिगाऱ्याखाली दबला गेला आहे. दरम्यान,हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात भूस्खलन आणि अचानक पुराच्या घटना घडत आहेत. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
शिमला येथे घडलेली घटना दुःखदायक आहे. ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सुरक्षा जवान बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. यासह सैन्याचे जवानदेखील घटनास्थळी पोहोचले असून तेही मदत कार्य करत आहेत. – मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू