भावाने घेऊन दिली बाईक आणि कार त्यानंतर केले असे की पोलिसही बुचकाळ्यात पडले

ग्वाल्हेर / नवप्रहार मीडिया
पैशाच्या लालसेपायी लोकांच्या मनात खोटं निर्माण होते. आणि हीच गोष्ट त्यांना आंधळी करते. त्यांना डोळ्यासमोर पैसा आणि पैसाच दिसत असल्याने त्यांना नात्यागोत्यचे देखील भान राहत नाही. पैश्यासाठी एका व्यक्तीने आपल्या चुलत भावाला ठार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार त्याने विम्याची रक्कम हडपण्यासाठी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य म्हणजे भावावर त्याचे किती प्रेम आहे हे दर्शवण्यासाठी त्याने भावाला बाईक आणि कार घेऊन दिली होती.
पोलिसांच्या तपासात ही सगळी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणात आरोपींना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ग्वाल्हेरच्या मुरार भागात राहणारे जगदीश जाटव यांचा मृतदेह 19 ऑक्टोबर रोजी शीतला माता मंदिर रोडवरील शेतात सापडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी मृत जाटव यांचे कॉल डिटेल्स काढले. यामध्ये जाटव यांना मृत्यूपूर्वी नऊवेळा फोन आला होता अशी माहिती समोर आली. जाटव हे ज्याच्यासोबत बोलत होते पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यानंतर पोलीस तपासात तो फोन चोरीला गेल्याची माहिती समोर आली.
कॉल डिटेल्सवरून पोलिसांना माहिती मिळाली की, मृत्यूपूर्वी त्याने याच क्रमांकावर त्याच्या मोबाईलवर 9 वेळा कॉल केला होता. मृत व्यक्तीने ज्या फोनवर 9 वेळा बोलले त्या फोनचा तपशील पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली. पोलिस ज्या क्रमांकावर शोध घेत होते, त्याच क्रमांकावर दुसऱ्या व्यक्तीचेही सातत्याने बोलणे होत असल्याचे आढळले. ज्या मोबाईल क्रमांकावर मृताचे 9 वेळा बोलणे झाले तो मोबाईल चोरीला गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मात्र जाटव व्यतिरिक्त चोरीच्या मोबाईलवर जो फोन करत होता ती व्यक्ती मृताचा चुलत भाऊ अरविंद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांना हा पुरावा मिळताच त्यांच्या मनात अरविंद विरोधात शंका निर्माण झाली. मृतकाचा चुलत भाऊ अरविंद जाटव याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जाटवच्या हत्येसाठी गेल्या तीन महिन्यांपासून अरविंद योजना आखत होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान अरविंदने सांगितले की, जगदीश जाटव हा जगात एकटाच होता आणि याच गोष्टीचा फायदा घेतला. अरविंदने त्याच्या दोन मित्रांसह जगदीशला कार आणि बाईक घेऊन दिली. यानंतर या दोन्ही वाहनांचा विमाही काढण्यात आला. एका योजनेअंतर्गत जगदीश जाटव यांनी पंजाब नॅशनल बँकेत 50 लाख रुपयांचा विमा फक्त 3500 रुपयांमध्ये मिळवला. यानंतर अरविंदचे साथीदार अमर आणि बलराम यांनी मिळून जगदीश जाटव याचा रिलायन्स कंपनीत एक कोटी रुपयांचा विमा उतरवला.
यासोबतच एचडीएफसी बँकेच्या ग्रुप पॉलिसीअंतर्गत त्यांना 40 लाख रुपयांचा विमाही मिळाला. हत्येपूर्वी जगदीश जाटव यांचा एकूण एक कोटी 90 लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला होता. हे विम्याचे पैसे मिळवण्यासाठी अरविंदने त्याचे साथीदार अमर आणि बलराम यांच्यासोबत जगदीश जाटव यांच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे अरविंदने आधी जगदीशला नशेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. यानंतर अरविंदने साथीदारांसह जगदीशच्या छातीवर आणि डोक्यावर हातोड्याने अनेक वार केले. यातच जगदीशचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी जगदीशचा मृतदेह शेतात फेकून दिला, अशी माहिती ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक राजेश सिंह चंदेल यांनी दिली.