कोकणात आढळला एलियन ?
दापोली / प्रतिनिधी
एलियन ( पार ग्रहावरील प्राणी ) ला घेऊन अनेक तर्क वितर्क लावले जातात. काहींच्या मते पृथ्वीवर वेळप्रसंगी एलियन येत राहतात तर काहींच्या मते एलियन म्हणजे फक्त कपोलकल्पित पात्र आहे. अश्यातच कोकणातही एलियन आढळल्याचं म्हटलं जातंय. कोकणात दहा हजार वर्षांपूर्वीचे कातळ शिल्प आढळले असून ते हुबेहुब एलियन सारखे वाटतायेत
कोकणात अनेक ठिकाणी वेगवेगळे कातळ शिल्प यापूर्वी आढळून आले आहेत. मात्र अशा प्रकारचे कातळ शिल्प यापूर्वी कुठेही आढळून आले नाहीत त्यामुळे उंबरले येथील या कातळ शिल्पाला खूप महत्त्व प्राप्त झालंय.
उंबर्ले गावात ‘गाढवाचा खडक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात सहा कातळशिल्पे आढळली आहेत. यात एका मानवाकृतीसोबत तीन हरणे व दोन बैल या प्राण्यांची चित्रे आहेत. मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते. कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशिंडधारी असे हे दोन बैल आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे आजपासून किमान पाच दहा हजार वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत, असा अंदाज करता येतो.
बैल हा प्राणी असल्याने, या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन, म्हणजे मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा, असा अंदाज आहे. अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचे डॉ. धनावडे यांनी नमूद केले. आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत.
दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक आहे. तर मंडणगड तालुक्यातही कातळशिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. डॉ. अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत, त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. यामुळे या कातळशिल्पांचे रहस्य उघडणार आहे.
मंडणगड तालुक्यातील गोठे, धामणी, बोरखत, वेरळ या चार गावांच्या सीमेवरील वाघाचा कातळ या ठिकाणी आढळून आलेल्या कातळशिल्पाचा तोंडाकडचा भाग भग्नावस्थेत असल्याने तो डुक्कर किंवा गेंडा असण्याची शक्यता आहे. मंडणगड तालुक्यात आजवर कातळशिल्पांची नोंद झालेली नव्हती. मात्र सावित्री नदीच्या दक्षिण काठावरील गावांच्या सड्यावर हे उल्लेखनीय शिल्प आढळल्याने अभ्यासाला वेगळी दिशा मिळणार आहे. माणूस शिकारी अवस्थेत, भटक्या वृत्तीचा होता, त्या काळातील त्याच्या बुद्धीचा आवाका आणि उपलब्ध साधनांआधारे ही चित्रे त्याने कोरली. अशाच पद्धतीची आणखी कातळशिल्पे या परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.