क्राइम
गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या प्रेमी युगलांपैकी तरुणीचा मृत्यू तर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू

ब्रेकअप साठी भेटलो असल्याचे तरुणाचे म्हणणे
दोन अज्ञातांनी हल्ला केल्याचा तरुणाचा दावा
बडनेरा / प्रतिनिधी
अमरावती लगत असलेल्या बडनेरा हायवेवर अभियांत्रिकी विद्यालयात आयटी च्या प्रथम वर्षात शिकत असलेले तरुण आणि तरुणी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले होते. त्यापैकी तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुण आणि तरुणी ब्रेकअप साठी शेवटच्या भेटीला त्याठिकाणी आले होते आणि दरम्यान दोन अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.
बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघड झाली असून, बडनेरा पोलिसांनी तुर्तास सखोल चौकशी चालविली आहे. पोलिसांच्या मते ती घटना एकतर्फी प्रेमातून घडली असावी, पण पोलीस अद्याप कुठल्याही निष्कर्षावर पोहचले नाही. एक युवक, युवती गंभीर अवस्थेत वडुरा गावालगत पडले असल्याची माहिती पहाटे सहाच्या सुमारास बडनेरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले असता, तरूणीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर जखमी तरूण पाणी व ॲम्बुलन्स बोलवा, अशी आर्जव करताना मरणासन्न आढळून आला. दोघांच्याही गळ्यावर, मानेवर धारदार शस्त्राचे घाव आहेत. दोघेही साईनगर परिसरात भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस सुत्रानुसार, संजना शरद वानखडे (कांडली, परतवाडा) असे मृत तरूणीचे नाव आहे. तर जखमी तरूणाचे नाव सोहम गणेश ढाले (रा. तुळजापूर गांधी, ता. चांदूरबाजार) असे असल्याचे समोर आले आहे. दोघेही न्यु राम मेघे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आयटी फस्ट इअरचे विदयार्थी आहेत. दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते, अशी माहिती त्या दोघांच्या क्लासमेटनी पोलिसांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, एसीपी दत्तात्रय ढोले यांच्यासह बडनेराचे ठाणेदार नितीन मगर हे घटनास्थळी पोहोचले असून, तेथून दोघांचेही मोबाईलव मुलाची दुचाकी जप्त करण्यात आले. तर गंभीर जखमी तरूणाला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
बयानात म्हणाला, आम्ही ब्रेकअपसाठी भेटलो
दरम्यान, जखमी तरूणाचे प्राथमिक बयान नोंदविले गेले असून आपण आज पहाटे ब्रेकअपसाठी शेवटचे भेटायचे ठरविले होते, त्यानुसार आपण न्यु एक्सप्रेस हायवेवर पोहोचलो. तेथे बोलत असताना दोन अज्ञातांनी आमच्यावर हल्ला केला, एकाचवेळी हल्ला केल्याने आपण प्रतिकार करू शकलो नाही, असे त्याने बयानात म्हटले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.