राज्य/देश

रुग्णांच्या जीविताशी खेळ !  राज्यात बनावट औषधांचा पुरवठा ? 

Spread the love
मुंबई / विशेष प्रतिनिधी

             आजार बरा करण्यासाठी आपण औषध घेतो. औषधांवर आपण हजारो – लाखो रुपये खर्च करतो. पण रुग्ण बरा व्हावा यासाठी आपण पैशे खर्चून जे औषध विकत घेतो ते नकली किंवा बनावटी असल्याचे समोर आले तर ? राज्यात ११ जिल्ह्यात बनावटी औषध पूरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर म्हणजे जानेवारीपासून सरकारी संस्थांमधून या गोळ्या-औषधांचा पुरवठा झालाय.

‘दिव्य मराठी’च्या रिपोर्टनुसार, गेल्या सरकारमधले आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या धाराशिव जिल्ह्यातही बनावट औषधे पुरवण्यात आली. सुदैवानं औषध विभागाने तो साठा प्रतिबंधित केल्याने त्याचं वितरण झालं नाही. पण इतर जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचं वाटप झाल्याचं समोर येतंय. बीडमधल्या अंबाजोगाईत सरकारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही हा साठा होता. याप्रकरणी सूरत आणि ठाणे या दोन ठिकाणी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आधार मानलं जातं. पण इथं एका अॅटिबायोटिक गोळीत एजीथ्रोमायसिन हा घटकच नसल्याचं समोर आलं.

माहितीनुसार, ज्या बनावट कंपन्यांच्या नावानं महाराष्ट्रात औषध पुरवठा झाला त्यात म्रिस्टल फॉम्र्युलेशन – उत्तराखंड, रिफंट फार्मा – केरळ, कॉम्युलेशन – आंध्र प्रदेश. मेलवॉन बायोसायन्सेस – केरळ आणि एसएमएन लॅब – उत्तराखंड या कंपन्यांचा समावेश होता. तक्रारीनंतर महाराष्ट्राच्या औषध विभागाने संबंधित राज्यांच्या वैद्यकीय यंत्रणांशी संपर्क केला. त्यात मिळालेल्या उत्तरात संबंधित पत्त्यावर अशा कोणत्याही कंपन्याच नसल्याचं समोर आलं. त्यामुळे या कंपन्यांच्या नावानं महाराष्ट्रात नेमकं कोण औषध देतं होतं? यामागचे मास्टरमाईंड कोण आहेत? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

माहितीनुसार, धाराशीवला म्रिस्टल कंपनीचा औषधसाठा मिळाला होता तो परभणी, रायगड, रत्नागिरी, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, सिंधुदुर्ग, अमरावती, ठाणे आणि हिंगोली या जिल्ह्यांकडून पाठवला गेल्याची माहिती आहे. यातली रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा बीडमधल्या प्रकरणानंतर चौकशीला सुरुवात झाली, तेव्हा बोगस औषधांचं हे रॅकेट अजून खोलवर पोहोचलं.

बीडमधल्या बोगस औषधांचा साठा हा भिवंडीतल्या ॲक्वेटीस बायोटेक कंपनीकडून आला होता. यात मिहीर त्रिवेदी आणि द्विती त्रिवेदी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला गेला. यानंतर कुठून कुणाकडे औषधांचा पुरवठा झाला याची साखळी ही बीड, भिवंडी, मिरा रोड, सूरत ते थेट उत्तराखंडपर्यंत जावून पोहोचली. शेवटी जेव्हा उत्तराखंड सरकारच्या यंत्रणेला विचारणा झाली, तेव्हा त्या राज्यात औषध पुरवठा करणारी कंपनीच अस्तित्वात नसल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे या ५ कंपन्यांच्या नावे महाराष्ट्रात बोगस औषधांचा पुरवठा नेमकं कोण करत होतं? इतक्या महिन्यांपासून सामान्य लोकांच्या आरोग्याशी सुरु असलेला हा खेळ राजरोसपणे कसा काय सुरु होता? या प्रश्नांची उकल होणं गरजेचं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close