11 संशयितांना लोहमार्ग पोलिसांनी केली अटक
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
बांगलादेश मधून अनधिकृत रित्या भारतात प्रवेश करून रोजगारासाठी मोठ्या शहरात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 11 बांगलादेशी नागरिकांना आगरतला रेल्वे पोलिसांनी अटक केकी आहे. यात 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. यांच्याकडे कुठलेही अधिकृत दस्तावेज सापडले नाही. रेल्वे स्थानकावरून इतक्या लोकांना अटक केल्याने तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.
आगरतळा रेल्वे स्थानकावर या 11 जणांवर पोलिसांची आधीच नजर असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्यांना थांबवून ओळखपत्र वगैरे दाखवण्यास सांगितलं असता ते दाखवू शकले नाहीत. चौकशी केल्यावर असं आढळून आलं, की हे सर्व 11 लोक बांगलादेशी नागरिक आहेत, जे अवैधरित्या त्रिपुरामध्ये दाखल झाले होते. भारतात येण्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रेही त्यांच्याकडे नव्हती. पोलिसांनी त्यांना रविवारी न्यायालयात हजर केलं, तिथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
त्रिपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना काही बांगलादेशी नागरिक सिपाहिजाला जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आगरतळा रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याबाबत पोलिसांनी आधीच तयारी करून शनिवारी सायंकाळपासून शोधमोहीम सुरू केली होती.
प्रभारी अधिकारी तापस दास म्हणाले, ‘आम्ही आगरतळा रेल्वे स्थानकातून 11 जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये पाच महिला आणि सहा पुरुष आहेत. त्यांना चौकशीसाठी आगरतळा सरकारी रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.’ दास म्हणाले की, चौकशीदरम्यान बांगलादेशी नागरिक भारतात प्रवेश करण्यासाठीचे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र सादर करू शकले नाहीत. जीआरपी पोलिस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान हे लोक नोकरीच्या शोधात भारतात दाखल झाल्याचं आढळून आलं. आगरतळाहून ओडिशा, कोलकाता किंवा बंगळुरूला जाण्यासाठी ट्रेन पकडण्याचा त्यांचा विचार होता.
आगरतळा रेल्वे स्थानकावर बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक होण्याची ही पहिली घटना नाही. दोनच दिवसांपूर्वी येथे दोन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं होतं, जे कर्नाटकला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी निघाले होते. यापूर्वी 26 जून रोजी येथे चार बांगलादेशी महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्याच्या तीन दिवस आधी, सहा महिलांसह नऊ बांगलादेशी नागरिकांना आगरतळा रेल्वे स्थानकावरून नोकरीच्या संधीच्या शोधात देशातील इतर राज्यांच्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतानाच अटक करण्यात आली होती.