नदीला आला अचानक पूर आणि चार लोक निघून गेले कायमचे दुर
नदीच्या पुरात वाहून गेलेल्या चार पैकी तीन विद्यार्थी ; त्यात एक बहीण भाऊ
जळगाव / नवप्रहार डेस्क
मृत्यू कधी आणि कसा तुम्हाला गाठेल याचा नेम नसतो . तो इतक्या चोर पावलांनी येतो की क्षणात होत्याचे नव्हते होते. रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांसोबत ही असेच घडले. हे विद्यार्थी सहज नदीवर गेले होते. पण अचानक नदीला पूर आल्याने त्यात चार लोक वाहून गेले. मुख्य म्हणजे यातील एका विद्यार्थ्याने या दुर्दैवी घटनेपूर्वी आईला व्हिडीओ कॉल करून त्यांचे पाण्यातील दृश्य दाखवले होते. आईने त्याला लवकर पाण्याबाहेर पडण्यास सांगितले होते. तो देखील हो म्हणाला।होता पण…..
जिया, जिशानसह जळगाव जिल्ह्यातील हर्षल देसले आणि मुंबईतील एक जण असे चौघे वाहून गेले. त्यापैकी हर्षलचा मृतदेह सापडला असून इतर तिघांच्या मृतदेहांचा शोध सुरु आहे. रशियातील यारोस्लाव-द-वाइज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटी परिसरात मंगळवारी ही घटना घडली. या विद्यापीठात जळगाव जिल्ह्यातील हर्षल देसले (१९, रा. भडगाव), जिशान पिंजारी (२०), जिया पिंजारी (२०, दोन्ही रा. इस्लामपुरा, अमळनेर), गुलाम मलिक (मुंबई) हे वैद्यकीय शिक्षण घेत होते.
मंगळवारी सायंकाळी हे सर्व काही मित्रांसह विद्यापीठाजवळील वोल्खोव्ह नदीकिनारी फिरायला गेले. ते नदीतही उतरले. नेहमीप्रमाणे जिशानचे आई शमीमशी दूरदृश्यप्रणालीव्दारे बोलणेही झाले. शमीम यांनी जिशानला लवकर पाण्याबाहेर पडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात नदीला पूर आला आणि क्षणात पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहून गेले. उपस्थितांनी काही जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात निशा सोनवणे या विद्यार्थिनीला वाचविण्यात यश आले. परंतु, जिशान, जिया, हर्षल आणि गुलाम हे बेपत्ता झाले. बचाव दलास हर्षलचा मृतदेह मिळाला. रात्री दोनच्या सुमारास जिशानचे वडील अशपाक पिंजारी यांना रशियातील नातेवाईकांनी संबंधित घटनेविषयी कळविले. जिशान आणि जिया हे दोन्ही अमळनेर येथील सेंट मेरी शाळेचे विद्यार्थी होते. अशपाक पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि बहिणीची मुलगी जिया या दोघांना गेल्या वर्षी जुलैत एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला वेलिकी नोवगोरोद शहरात रवाना केले होते. जिशानला एक बहीण आहे, तर जियाला एक भाऊ आहे. अशपाक पिंजारी शेतकरी आहेत.
हर्षल देसले याच्या घरी विद्यापीठाकडून निरोप देण्यात आला. हर्षल हा सहा महिन्यांपूर्वीच रशियात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला होता. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने घरी संपर्क साधला होता. त्यानंतर सकाळी त्याच्याशी कुटुंबियांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा भ्रमणध्वनी संच बंद होता. त्यामुळे कुटुंबियांनी रशियातील प्राचार्यांशी संपर्क साधला. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. हर्षल हा आईवडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील संजय पाटील- देसले यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असून, आई गृहिणी आहे. हर्षलला एक बहीण आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशियातील दूतावासातील कुमार गौरव या अधिकाऱ्यांशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. अमळनेरचे प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी पिंजारी कुटुंबियांचे सांत्वन केले. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाशी संपर्क करून मदतीत कोणतीही अडचण येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.
रशियातील सरकारसह केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने दुर्घटनेला गांभीर्याने घेतले असून यंत्रणेकडून विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. भारतीय दूतावासातील अधिकार्यांनी माझ्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. पहिल्या दिवशी एका विद्यार्थ्याचा मृतदेह मिळून आला होता. शुक्रवारी आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह मिळून आला. रशियन सरकारकडून मृतदेह पाठविण्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)