अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची विक्री करणाऱ्या 7 व्या आरोपीला चार वर्षानंतर अटक

गोंदिया / नवप्रहार मीडिया
गोंदिया येथून 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची मध्यप्रदेश येथे नेऊन 60 हजारात विक्री करण्यात आली होती. या प्रकरणात 7 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील दोन आरोपी प्रशांत ऊर्फ चुटकी उमेशचंद पांडे (२८) रा. सुक्लुढाना आणि लक्की बरमैय्या (२५) सुक्लुढाना हे घटनेनंतर फरार होते यातील पांडे याला नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती. पण बरमैय्या हा पोलिसांना गवसत नव्हता. शेवटी पोलिसांनी त्याला छिंदवाडा येथून अटक केली आहे.
असा आहे घटनाक्रम –
1 डिसेंबर 2018 ला 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे नेण्यात आले. तेथे तिची ६० हजारात विक्री करण्यात आली. यासंदर्भात त्या मुलीच्या मामाने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून २२ मार्च २०१९ ला गोंदिया शहर पोलिसांनी सात जणांवर भादंविच्या कलम ३६६ (अ), ३७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पाच आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतरच अटक करण्यात आली होती. परंतु दोन आरोपी फरार होते. या दोनपैकी फरार असलेला आरोपी प्रशांत ऊर्फ चुटकी उमेशचंद पांडे (२८) रा. सुक्लुढाना याला ७ नोव्हेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तर सातवा आरोपी लक्की बरमैय्या (२५) याला ९ डिसेंबर २०२३ ला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, पोलिस हवालदार श्यामकुमार कोरे, सुमित जांगळे यांनी केली आहे.
या प्रकरणातील आरोपींचे नावे –
सुनीता मेश्राम (३२), निक्की दुर्गेश मेश्राम (३४), आशा अनिल कांबळे (४०), शुभम डेहरीया (२१), जसवंत ठाकूर (२५), प्रशांत पांडे (२८) व लक्की बरमैय्या (२७) यांचा समावेश आहे.
दलालांना मिळते मोठी रक्कम –
पंजाब, हरयाणा येथे मुलींची संख्या कमी असल्याने तेथील पुरुष मंडळी मुली विकत घेण्यासाठी महाराष्ट्रात येतात. गरिबी व अडचणीचा फायदा घेऊन गरीब मुलींच्या आई-वडिलांना तुमची मुलगी सुखी राहील, असे विविध आमिष देऊन तुमच्या मुलीचे लग्न लावून द्या, असे सांगितले जाते. त्यामुळे त्या दलालांच्या शब्दात येऊन परप्रांतातील अनोळखी व्यक्तीच्या हाती अनेक जण आपली मुलगी सोपवितात. ही मुलगी मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात दलाल सक्रिय झाले आहेत. यापूर्वीही असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलगी मिळवून देणाऱ्या दलालांना मोठी रक्कम मिळत असते.
अल्पवयीन मुलींना दाखविल्या जाते आमिष –
पौगंडावस्थेतील मुलींना प्रेमाच्या भूलथापा देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची विक्री परप्रांतात केली जाते. घराबाहेर मुलगा किंवा मुलगी असली तर ते इतके वेळ कुठे होते याची माहिती पालक घेत नाही, त्यामुळे समाजकंटकांना संधी साधण्याची वेळ मिळते. यातूनच असे घृणास्पद प्रकार घडतात.