उद्धव ठाकरे यांच्या वागण्यामुळेच युती तुटली- संजय सिरसाट
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
शिवसेना ( उद्धव ठाकरे सेना ) आणि भाजपा यांच्यातील युती संपुष्टात आल्यानंतर दोन्ही पक्षांकडून युती त्यांच्यामुळेच तुटली असे परस्परांवर आरोप करण्यात येत आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी कधी फडणवीस तर कधी केंद्रीय नेतृत्वाला दोष दिला आहे. तर फडणवीस , अमित शहा इतकेच काय तर मोदी यांनी सुद्धा सेनेला यासाठी जबाबदार ठरवले आहे. पण आता शिंदे गटातील आमदार ( तत्कालीन संयुक्त शिवसेनेचे) संजय सिरसाट यांनी भाजपा शिवसेना युती तुटण्यामागे उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. काही लोकांनी उद्धव ठाकरेंचा गैरसमज करणारी माहिती देऊन त्यांची कानं भरली आणि युती तुटली असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, 2019 जेव्हा सर्व निवडणुका झाल्यात, त्यावेळी आम्हाला सर्वांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. यावेळी सर्वच आमदार त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी पहिलं मुख्यमंत्री पद कोणाला? हा विषय निघाला. परंतु, निवडणुकीतील भाषणं पाहिले तर पुढेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक सभेत वेळोवेळी उल्लेख झाला. असे असतांना पाहिले मुख्यमंत्री पद आम्हाला द्या, वाटल्यास मंत्रालयाच्या आवारात एका बोर्डवर कालावधी किती असेल असे आपण लिहू असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी दिला. दरम्यान, शिवसेनेचे अनेक नेते फडणवीस यांच्या संपर्कात होते आणि असे करून नका फडणवीस वारंवार सांगत होते. शेवटी मात्रोश्रीवरून निरोप गेला की, आम्ही साडेपाच वाजता निर्णय कळवतो. त्यानंतर 6 वाजता सांगतो, 7 वाजता सांगतो असे सर्व प्रकार घडत गेले आणि शेवटी फोन घेणं बंद केले. त्यावेळी युती तुटल्याचे चित्र आमच्यासमोर आले, असं शिरसाट म्हणाले.
तर मातोश्रीवर बोलवण्यात आलेल्या बैठकीत आम्ही सर्वजण होतो. यावेळी सत्तेचं वाटप पन्नास-पन्नास टक्के करण्यावर सर्वजण सहमत होते. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले होते. शिंदे हे उद्या मुख्यमंत्री होणार म्हणून पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली होती. पण याचवेळी आमच्याच पक्षातील काहींनी शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पक्ष हातात घेतील असे उद्धव ठाकरे यांना सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नावाला त्यावेळी देखील भाजपचा विरोध नव्हता. मात्र, शिंदे मुख्यमंत्री झाल्यास उद्धव ठाकरेंचं वर्चस्वाला धक्का पोहचेल असे काही गैरसमज काही लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात घातला. या लोकांचा फक्त युती तोडण्याकडे कल होता. त्यामुळे युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादीसह काँग्रेससोबत युती केली, असल्याचं शिरसाट म्हणाले.