ट्युशन टीचर च्या येथे विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ
दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षांच्या मुलाचा मृतदेह ट्युशन टीचर क्या येथे सापडल्याने खळबळ माजली आहे. कुशाग्र असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. टीचर आणि कुशाग्र याचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येला खंडणीचा प्रकार दर्शविण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांकडून करण्यात आला . पण पोलिसांनी तंत्रशुद्ध तपास करत या हत्याकांडाचा उलगडा केला. दोन आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.त्यांनीं त्यांचा गुन्हा कबूल केला आहे.
उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे ही घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या कुशाग्र हा रुचिता नावाच्या महिलेकडे शिकवणीसाठी जात होता. सोमवारी संध्याकाळी तो आपली स्कुटर घेऊन ट्युशनसाठी घरातून निघाला होता. मात्र रात्रीपर्यंत तो घरी आला नाही. कुटुंबीय त्याच्या काळजीत असतानाच अचानक त्यांच्या घरात एक व्यक्ती चिठ्ठी टाकून फरार झाला. या चिठ्ठीत ३० लाखांची खंडणी देण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या कुटुंबीयांनी लगेचच पोलिसांशी संपर्क साधला.
सुरुवातीला पोलिसांनाही हा अपहरणाचे प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. मात्र, शोध आणि चौकशी केल्यानंतर पोलिसांना कुशाग्रचा मृतदेह सापडला. त्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले. कुशाग्रचा मृतदेह त्याच्या ट्युशन टिचरच्या घरातील स्टोअर रुममध्ये सापडला. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करताच ट्युशन टिचरचा प्रियकर प्रभातने कुशाग्रचा गळा घोटून खून केला होता. त्यांनी व्यवस्थित कट रचून कुशाग्रची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणात प्रभातचा मित्र आर्यनने त्याला साथ दिली होती.
दहावीत शिकणाऱ्या कुशाग्रचे रुचितासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रभातने त्याची हत्या केली. हत्येनंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने खंडणीचे नाटक रचले. पोलिस अपहरणाच्या अँगलने तपास करतील आणि आपण सहीसलामत सुटू या विचाराने प्रभातने कुशाग्रच्या घरी खंडणीचे पत्र पोहोचवले.
कुशाग्रचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले. घटनास्थळवर प्रभातचा वावर आणि खंडणीच्या पत्रातील हस्ताक्षर यामुळं पोलिसांचा प्रभातवर संशय वाढला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच दोघा आरोपींनी खरं काय ते सांगून टाकलं. प्रेमप्रकरणातून कुशाग्रची हत्या करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीत काय दिसले?
सीसीटिव्हीमध्ये कुशाग्र त्याच्या मर्जीने रुचिताच्या घरी गेला होता. त्यानंतर त्याच्या मागे रुचिताचा प्रियकर घरात गेला. त्यानंतर काही वेळातच प्रभात घराबाहेर पडला मात्र कितीतरी वेळ झाला तरी कुशाग्र घराबाहेर पडला नाही. त्यामुळं या घरातच त्याच्यासोबत काही बरं वाइट झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि पोलिसांना संशय खरा ठरला.