वारी येथील श्री.हनुमान सागर मध्ये अद्यापही 50 टक्के पेक्षा कमी जलसाठा
रितेश टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
जिल्ह्यात सर्वत्र सतत धार पाऊस सुरू असताना सुद्धा तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्प परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सद्यस्थितीत हनुमान सागर वान प्रकल्पात 27.04% जलसाठा असल्याची माहिती वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली. श्री .वारी हनुमान सागर प्रकल्पात आजचा उपयुक्त साठा 22.16 दलघमी , एवढा असून याची टक्केवारी 27.04 % एवढी आहे. हिवरखेड पासून जवळच अकोला, अमरावती, बुलढाणा, या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी हनुमान येथे वान नदीवर “वान प्रकल्प” हे धरण आहे. येथील जलाशयाला हमूमान सागर असे नाव दिले आहे. ह्या प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो गावे आणि अनेक शहरातील लक्षावधी जनतेची तहान वर्षानुवर्षांपासून भागत आहे. याच प्रकल्पातून 84 खेडी पाणीपुरवठा योजना आहे.एवढेच नव्हे तर ह्या पाण्याच्या सिंचनातून हजारो शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे वान प्रकल्पाला “वरदान प्रकल्प” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या धरणाची विशेषता म्हणजे एखादा अपवाद वगळता हे धरण दरवर्षी शंभर टक्के पूर्ण भरते. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या धरणात मागील वर्षीचा बराच जलसाठा शिल्लक होता. अकोला जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच सातपुडा पर्वतातील मेळघाट क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे ह्या वर्षी “वरदान प्रकल्प” भरते की नाही अशी चिंता शेतकरी बांधवांसह सर्वांनाच लागली आहे. परंतु मागील 12 तासा पासून तेल्हारा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे मात्र धरणाचा जलसाठ्यात अत्यल्प वाढ झाली आहे. आतापर्यंत जलसाठा 27.04 % टक्के वर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात समाधान कारक पाऊस नाही मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी चार-पाच दिवस जोरदार वृष्टी होणार आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा वारी हनुमान सागर पूर्णता भरण्याची आशा पल्लवित झाली आहे. हनुमान सागर मधून निघालेल्या कालव्यां द्वारे परिसरातील हजारो एकर शेती ओलित केल्या जाते. हनुमान सागरातून निघालेल्या कालव्याद्वारे शेतकरी गहू ,चना ,भुई शेंग व उन्हाळी मूग इतर बरेच पिके घेतात.परिसरात काल पासून सुरू असलेले संततधार पावसामुळे परिसरातील शेतकरी आनंदित दिसत आहे. वारी हनुमान सागर अकोला बुलढाणा या दोन जिल्ह्यांसाठी वरदान आहे. तरी यावर्षी ऑगस्ट महिन्या तील पावसाने पुन्हा श्री हनुमान सागर पूर्णता भरेल व शेतकऱ्यांच्या आशा पूर्ण होतील अशा आशेवर शेतकरी दिसत आहे.अशी माहिती युधिष्ठिर भांगडिया सहाय्यक अभियंता वानप्रकल्प व्यवस्थापन उपविभाग तेल्हारा व शाखा अभियंता नयन लोणारे यांनी दिली आहे.