अभ्युदय मेघे यांच्या त्या कृतीवर सागर मेघे यांची संतप्त प्रतिक्रिया
ते असे पाऊल उचलतील असा स्वप्नातही विचार केला नव्हता
वर्धा / आशिष इझनकर
अभ्युदय मेघे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मेघे कुटुंबियांना धक्का बसला असल्याचे सागर मेघे यांच्या वक्त्यावरून दिसून येत आहे. त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून आपली नाराजी आणि मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांच्या या कृतीचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता . ‘ आता तू तुझा चेहराही दाखवू नकोस ‘ या शब्दात त्यांनी अभ्युदय मेघे यांना खडसावले आहे.
अभ्युदय मेघे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबई येथे काँग्रेस लक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे. सोबतच विधानसभा उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी अर्ज देखील दिला आहे. त्यांच्या या कृतीचा मेघे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
निवेदनाच्या माध्यमातून मेघे संस्थेचे कर्ताधर्ता सागर मेघे यांनी आपली प्रतिक्रिया देताना बोचऱ्या शब्दांचा वापर केला आहे. यापुढे तुझा चेहराही दाखवू नकोस, असे व्हाट्स अँप वर संदेश टाकून त्यास कळविले आहे. उदय मेघे यांनी कोणतीही कल्पना न देता किंवा आमच्या परिवारास विश्वासात नं घेता काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. गेल्या वीस वर्षापासून संस्थेच्या कामामुळे जवळचे संबंध निर्माण झाले होते. म्हणून त्यांना महत्वाचे पद देत संस्थेच्या हिताची जबाबदारी सोपविली. मात्र नैतिकतेचे पालन न करता अचानक पाठीत खंजीर खुपसेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांचे हे कृत्य विश्वासघात करणारे असून आपला चेहराही दाखवू नकोस असा निरोप दिला असल्याचे सागर मेघे यांनी नमूद केले आहे.
आमच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार असल्यास मेघे समूहाशी तसेच माझ्या परिवाराशी कोणतेही संबंध यापुढे राहणार नाही, असाही निरोप स्पष्टपणे देण्यात आला आहे. यापुढे मी त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवणार नाही. ज्या पक्षात उदय मेघे यांनी प्रवेश घेतला आहे, तो पक्ष उदय मेघेस विधानसभेची उमेदवारी देईल, असे मला वाटत नाही. आणि उमेदवारी दिलीच तर भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार डॉ. पंकज भोयर हेच निवडून यावेत यासाठी मी अथक प्रयत्न करणार, असा इशाराही सागर मेघे यांनी आज दिला.
हा संताप व्यक्त करण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. एक तर येथील मेघे अभिमत विद्यापीठाचा सर्व कारभार उदय मेघे हे एकहाती सांभाळत होते. मेघे परिवाराचा अधिकृत स्थानिक चेहरा म्हणून लोकं विविध मदतीसाठी त्यांच्याचकडे धाव घेत. रुग्णसेवा किंवा वैद्यकीय कारभारातील अडचणी सोडविण्यात त्यांचेच प्रथम मार्गदर्शन अधिकारी वर्ग घेत असे. आता कोण असा प्रश्न आहे.