ठाकरेंनी महापौर पदाचा उमेदवार न देण्यामागे नेमके कारण काय ?

मुंबई / विशेष प्रतिनिधी
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भाजपा ने आपला महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी उमेदवार न दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असलं तरी ठाकरे गट हा मुंबईतील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस, मनसे, शरद पवार गट अशी मिळून मुंबईत मविआची चांगली ताकद आहे. असं असूनही ठाकरेंनी महापौर पदासाठी उमेदवार दिला नाही. ठाकरेंच्या या भूमिकेमागं रणनीती आहे की भीती आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंनी महापौर पदासाठी उमेदवार न देण्याची कारणं काय असू शकतात, तेच जाणून घेऊयात…
भाजपनं रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवारी दिली आहे.तर शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली होती. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. मुंबईत मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांनी स्वत: आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र ऐनवेळी नगरसेवक फुटू शकतात, अशी भीती कदाचित ठाकरेंना असावी, म्हणूनच त्यांनी उमेदवार देण्याची रिस्क घेतली नाही.
शिवाय इथं काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिका निवडणूक लढताना ठाकरे गट आणि काँग्रेस दोघंही महाविकास आघाडीचा भाग असूनही त्यांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. आता महापौर पदासाठी संख्याबळ जुळवण्यासाठी ठाकरेंना पुन्हा काँग्रेसच्या दारी जावं लागलं असतं. तसेच इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकमेव नगरसेवक देखील शिवसेना शिंदे गटासोबत केला आहे. अशात संख्याबळ जुळवणं आणि ते एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंपुढं होतं, त्यामुळे त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत, उमेदवार देण्याचं टाळल्याची चर्चा आहे.
ठाकरे गटाने मुंबईत महापौर पदाचा उमेदवार न देऊन आपला एक डाव राखून ठेवला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे स्पष्ट बहुमत असताना ठाकरेंनी उमेदवार देण्याची चूक केली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे मतं फोडण्याची ताकद ठाकरेंकडे नाही, त्यामुळे ठाकरेंनी काहीही न करता आपला एक डाव राखून ठेवला आहे. त्यांनी उमेदवार दिला असता तर ते स्वत:चं उघडे पडण्याची शक्यता अधिक होती, अशा स्थितीत त्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची प्रमाणे भूमिका घेतली आहे.
ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवार न देऊन शिंदेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. इथं ठाकरेंनी उमेदवार दिला असता तर साहजिक भाजपला मतांची जुळवाजुळव करावी लागली असती. यासाठी त्यांना शिवसेना शिंदे गटाला पायघड्या घालाव्या लागल्या असत्या. तडजोड करून अडीच वर्षे महापौरपदही द्यावं लागलं असतं, मात्र ठाकरेंनी उमेदवार न देता शिंदेंचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय भाजपला देखील पडद्याआडून खूश करण्याचा प्रयत्न केला.




