शेतकरी राजाला खुशखबर! एकादशीपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस
दर्यापुर : कैलास कुलट — शेतकऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांच्या नजर आकाशाकडे लागून आहेत. सगळ्यांनाच आता मान्सून सक्रिय होण्याची प्रतीक्षा आहे. हि प्रतीक्षा पूण होत असून येत्या २५ जून पासून अमरावती जिल्ह्यासह विदर्भात मान्सून सक्रिय होनार असल्याची दिलासादायक माहिती गुरुवारी हवामान खात्याकडून प्राप्त झाली. यंदाच्या प्रचंड उकाड्याने हैराण नागरिकांसह पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याचे नक्की झाले आहे. येत्या २३ जूनपासून तापमानात घट होऊन २३ जून ते २५ जुन या कालावधीत अमरावती सहित विदर्भात हलक्या व मध्यम स्वरूपात पावसाची दमदार हजेरी लागणार असल्याचे स्थानिक हवामान तज्ञ डॉ. अनिल बंड यांनी सांगितले.
लांबलेल्या या मान्सूनचा प्रवास आता सुकर झाला असून आता थबकलेला मान्सून रत्नागिरी भागावर सक्रिय आहे. पुढील दोन दिवसांत मानसुन दक्षिण भारताच्या आनखी काही भागात, ओरिसाच्या उर्वरित भागात, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड तसेच छत्तीसगड मध्यप्रदेश उ.प्र.उत्तराखंड च्या काही भागात पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यानुसार आगामी २५ जूनपासून मान्सून विदर्भात सक्रिय होईल. २३ जूनपासून तापमानात घट होऊन विदर्भातील सर्व जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस व तुरळक ठिकाणी धुळवादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार आता पुढील विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या व मध्यम पावसासह थंडरस्टोर्म ,गडगडाट, विजा आणि वेगवान वारे प्रवाहित होऊन पुर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडु शकतो. तसेच चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचे संकेत हवामान खात्याने वर्तविले आहे.
२६ जुन रोजी विदर्भात सार्वत्रिक तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २७ ते २९ जुन दरम्यान चांगला पाऊस बरसेल. यासोबतच मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पावसाच्या आगमनाने आता उन्हाळ्याच्या उकाड्यापासून निश्चितच मुक्ती मिळणार आहे. तसेच पीक,बीज पेरणीपूर्वी खबरदारी बाळगून असलेल्या बळीराजाला या पावसाच्या हजेरीमुळे दिलासा मिळणार असून शेतीच्या कामकाजासाठी आता शेतकरी बांधवांचा मार्ग निश्चितच प्रशस्त झाला आहे.