राज ठाकरे यांचे ते विधान चर्चेत
रायगड / नवप्रहार मीडिया नेटवर्क
कोकण आणि मुंबईत पावसाची कोसळधार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना या ऋतूत फार धोका असतो. कोकण दौऱ्यावर असतांना राज ठाकरे यांनी इशालवाडीत घडलेल्या घटनेसारख्या घटना घडू शकतात असे म्हटले होते.आणि प्रत्यक्षात याठिकाणी घटना घडल्याने त्यांचे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे.”
कोकण विभागातील 18 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर पूर्व विदर्भाचा संपर्क तुटलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. या परिस्थितीत रायगडमधील खालापूरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण आतापर्यंत 27 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे ही नेते मंडळीदेखील इर्शाळवाडीत पोहचली आहे. एनडीआरएफच्या पथकांसह पनवेल महापालिकेचं बचाव पथक, सिडकोचे मजूर इर्शाळवाडीमध्ये मदतकार्यासाठी दाखले झाले आहेत. त्यांच्याबरोबर स्थानिक ट्रेकर्सचे समूहदेखील मदतीसाठी हजर आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेने राज ठाकरे यांचा गेल्या महिन्यातील एका भाषणाचा काही भाग सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. जून महिन्यात कोकण दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी आपल्या एका भाषणात कोकणात पावसाळ्यात दरडी कोसळतील, त्यामुळे प्रशासनाने जागरूक असावं, असा इशारा त्यामध्ये दिला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ११ जून २०२३ रोजी राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की, यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय, त्यासाठी शासन-प्रशासनाने जागृत राहावं. २० जुलै २०२३ रोजी रायगडच्या इर्शाळवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव ढिगाऱ्याखाली जाणं , माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी आहे.